प्रशासनाने नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा –जिल्हाधिकारी किशन जावळे प्रशासन गाव की ओर सुशासन सप्ताह जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न…
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:-माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने देशव्यापी सुशासन सप्ताह सुरु केला आहे. प्रशासन जनतेसाठी काय करते याची माहिती व्हावी, हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य जनतेला सेवा सुविधा उपलब्ध करून देवून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
सुशासन सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळा आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हाधिकारी रायगड एच.के.जावळे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ.रविंद्र शेळके तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले, शहरीकरण जरी वाढत असले, तरी गावांमध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ राहत असतात. येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, हे आपले प्रमुख काम आहे. त्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करणे, सार्वजनिक तक्रारी निर्गत करणे, ऑनलाईन सेवेमधील विलंबितता टाळून त्या पुरविणे आदी कामे गतीने करावीत. आपल्याकडे आलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक किंवा सामाजिक समस्या व्यवस्थितपणे ऐकून घेत त्यांना प्रत्येक अधिकारी,कर्मचाऱ्यांने हसतमुखाने उत्तर देवून त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, अशा सूचनांही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. आपण लोकांसाठी आहोत याची जाणीव प्रत्येकाला असणे तितकेच महत्वाचे आहे. आपल्याला जे पद मिळाले आहे त्या पदाचा उपयोग सर्व सामान्य जनतेच्या कामासाठी वापरले पाहिजे. प्रत्येकाने कामकाज केल्यानंतर त्याचे लिखाण करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासन गाव की ओर ही एक अतिशय महत्वाची थिम असून अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगले काम करण्याची संधी आहे
प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हाधिकारी रायगड एच.के.जावळे मार्गदर्शन करताना म्हणाले, केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या निर्देशानुसार या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा केंद्र शासनाचा स्तुत्य उपक्रम असून कामकाज करताना पारदर्शकता असली पाहिजे आणि कामकाज विहित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वाड्या, वस्त्या असून शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत त्यांच्या असलेल्या समस्या संवाद सेतू या उपक्रमातून सोडविण्यावर भर द्यावा, असेही निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. या उपक्रमात सार्वजनिक सेवेचे वितरण, तक्रार निवारण, पारदर्शकता या तीन महत्वाच्या बाबी आहेत. कायदा व व्यवहाराची सांगड घालून तसेच मानवी दृष्टीकोन व सहानुभूतीचा दृष्टीकोन ठेवून जनतेचे प्रश्न सोडवावेत. प्रशासकीय सेवा करताना आपण गोरगरीब जनतेची सेवा करतो त्याचे पुण्य आपल्याला नक्कीच मिळते.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके यांनी मानले. या कार्यशाळेवेळी प्रत्येक शासकीय विभागांनी मागील वर्षात जिल्ह्यात सुशासन उपक्रमांतर्गत राबविलेल्या योजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थितांना दाखविण्यात आली.