
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जाहीर झालेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे,असे आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकारांना संबोधित केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड आदी यावेळी उपस्थित होते.पत्रकार परिषदेत निवडणूक विषयक विविध मुद्यांबाबत माहिती देण्यात आली-निवडणूक कार्यक्रम,या निवडणुकीची सूचना 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध होईल.
नामनिर्देशन पत्र दाखल करणे- शुक्रवार दि.१६ ते मंगळवार दि.२१ जानेवारी २०२६. नामनिर्देशन पत्र छाननी- बुधवार दि.२२ जानेवारी २०२६ (सकाळी ११ वा. पासून) त्यानंतर लगेचच वैध नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.उमेदवारी माघारी- दि.२३, दि.२४ जानेवारी व दि.२७ जानेवारी २०२६ सकाळी ११ ते दुपारी ३ वा. पर्यंत. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रसुद्धी- मंगळवार दि.२७जानेवारी दुपारी साडेतीन वा. नंतरमतदान- गुरुवार दि.५ फेब्रुवारी २०२६ सकाळी साडेसात ते सायं. साडेपाच वा. पर्यंत. मतमोजणी-शनिवार दि.७ फेब्रुवारी सकाळी १० वा. पासून.
६३ गट, १२६ गण,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जिल्ह्यात एकूण जिल्हा परिषदचे ६३ गट आणि पंचायत समितीचे १२६ गण क्षेत्रात होणार आहे. त्यासाठी १ जुलै २०५ रोजी अंतिम झालेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. तालुकानिहाय गट व गणांची संख्या याप्रमाणे- सोयगाव-३ गट, ६ गण, सिल्लोड-९ गट, १८ गण, कन्नड-८ गट, १६ गण, फुलंब्री ४ गट, ८ गण, खुलताबाद-३ गट, ६ गण, वैजापूर-८ गट, १६ गण, गंगापुर-९ गट, १८ गण, छत्रपती संभाजीनगर १० गट, २० गण, पैठण ९ गट, १८ गण असे एकूण ६३ गट व १२६ गण आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय एक निवडणूक निर्णय अधिकारी व एक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी काम पाहतील. एकून २२८२ मतदान केंद्रांवर नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. तालुकानिहाय मतदान केंद्र संख्या याप्रमाणे- सोयगाव-११३, सिल्लोड-३०५, कन्नड-३१७, फुलंब्री-१५५, खुलताबाद-१०४, वैजापूर-२८१, गंगापूर-३४७, छत्रपती संभाजीनगर-३५४, पैठण-३०६.
१० हजारांहून अधिक मनुष्यबळाची आवश्यकता, २२८२ मतदान केंद्रावर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील त्यासाठी १० हजार ०४८ अधिकारी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून १२ हजार मनुष्यबळाची उपलब्धता आहे, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. या मनुष्यबळाची सेवा उपलब्ध करुन घेणे, त्यांचे प्रशिक्षण घेणे. विविध समित्यांचे गठन करणे अशा विविध प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत.निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यात ९ निवडणूक निणय अधिकारी व ९ सहा. निवडणूक निर्णय अधिकारी असतील. या सर्व प्रक्रियेवर जिल्हास्तरीय कार्यालयातून नियंत्रण ठेवले जाईल, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
५०२४ मतदान यंत्रे लागणार,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात ५०२४ मतदान यंत्रे, २५१२ कंट्रोल युनिट लागणार आहे. ही यंत्रे नांदेड हून मागविली जाणार आहेत. त्यात ३०४८ कंट्रोल युनिट,५५९२ मतदान यंत्रे येणार आहेत. या यंत्राचे प्रथम स्तरीय पडताळणी जिल्हास्तरावर करुन नंतर ते निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर पाठवण्यात येतील.
संबंधित क्षेत्रात आचारसंहिता,निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. संबंधित क्षेत्रात ही आचारसंहिता लागू झाली असली तरी अन्य ठिकाणीदेखील संबंधित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही; परंतु नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल.
१८ लक्ष ७३ हजार मतदार बजावतील हक्क,जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावे लागते. त्यामुळे एका मतदाराने दोन मते देणे अपेक्षित असते.
मतदार संख्या- तालुकानिहाय मतदार संख्या याप्रमाणे-सोयगाव- पुरुष-४५९७१, स्त्री-४१७७५ इतर- १, एकूण-८७७४७सिल्लोड- पुरुष-१२९८६५, स्त्री-११९००८ इतर- १, एकूण-२४८८७४कन्नड- पुरुष-१३५५५३, स्त्री-१२२५२३ इतर- ४, एकूण-२५८०८० फुलंब्री- पुरुष-६६७५१, स्त्री-६१०७१ इतर- १, एकूण-१२७८२३खुलताबाद- पुरुष-४४४५३, स्त्री-४०८५३ इतर- १, एकूण-८५३०७
वैजापूर- पुरुष-११६९४३, स्त्री-१०७००४इतर- ०, एकूण-२२३९४७गंगापूर- पुरुष-१५५२०६, स्त्री-१४२५४४ इतर- १४, एकूण-२९७७६४छत्रपती संभाजीनगर- पुरुष-१५५२२४ स्त्री-१४०५२७ इतर- १५, एकूण-२९५७६६पैठण- पुरुष-१२९२६८, स्त्री-११८४७३ इतर- ४, एकूण-२४७७४५जिल्ह्यात एकूण ९ लाख ७९ हजार २३४ पुरुष , ८ लाख ९३ हजार ७७८ स्त्री तर ४१ इतर असे एकूण १८ लक्ष ७३ हजार ०५३ मतदार आपल मतदानाचा हक्क बजावतील.
नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीने,नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने नामर्निर्देशनपत्रे व शपथपत्रे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती; परंतु विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन या निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात पारंपरिक पद्धतीने म्हणजे ऑफलाईन पद्धतीने नामर्निर्देशनपत्रे व शपथपत्रे स्वीकारण्यात आली. त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीतसुद्धा ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आले होते. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही आता ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देनपत्रे स्वीकारण्यात येतील.
‘जातप्रमाणपत्र वैधता ,राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते; परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल.
कायदा सुव्यवस्था,या निवडणूकीसाठी जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून त्यासाठी जिल्ह्यात १९३ अधिकारी, ३०० पोलीस कर्मचारी, १९३२ होमगार्डस जिल्ह्यात उपलब्ध आहेत. शिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ कंपन्या बाहेरील जिल्ह्यातून मागविण्यात येणार आहेत. या शिवाय प्रतिबंधात्मक कारवाई राबविण्यात येऊन समाजकंटकांवर कारवाई करण्यात येत आहे. शस्त्र जमा करणे आदी कारवायाही सुरु आहेत,असे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.
०००००



