बातमी संदर्भात माहिती घेत असतांना गुत्तेदाराची शिवीगाळ, धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
जालना | प्रतिनिधी – लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर थेट हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज जालना जिल्हा परिषद कार्यालयात घडली. बातमीच्या अनुषंगाने माहिती घेत असताना एका गुत्तेदाराने पत्रकारास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आज सोमवार, दि. 2 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास दैनिक जनश्वासचे संपादक भरत गणपतराव मानकर हे जिल्हा परिषद बांधकाम विभागातील सहाय्यक लेखाधिकारी श्री. हारुण यांच्या कॅबिनमध्ये एका बातमीच्या संदर्भात माहिती घेत बसले होते. त्यावेळी श्री. बांगड नावाचा गुत्तेदार अचानक तेथे आला.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित गुत्तेदाराने अत्यंत गलिच्छ, अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत,
“कोण मादरचोद पत्रकार आहे हा आमचे बिल रोखण्याचा प्रयत्न करतो त्याचे हातपाय तोडून टाकू याला लय मस्ती आली आहे” अशा धमकीवजा शब्दांचा वापर केला. इतकेच नव्हे तर पत्रकार मानकर यांना प्रत्यक्ष धक्काबुक्की करत कार्यालयातून हाकलून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
बातमी छापून येण्याचा राग की भ्रष्टाचार उघड होण्याची भीती?
या घटनेमागे केवळ वैयक्तिक राग नसून, बांधकाम विभागातील कामांच्या चौकशीची भीती असल्याची चर्चा आहे. पत्रकार मानकर हे संबंधित गुत्तेदाराच्या कामांबाबत माहिती घेत होते, त्यामुळे संभाव्य अनियमितता उघडकीस येण्याच्या भीतीनेच ही धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. यासोबतच, पत्रकार कार्यालयात आल्याची तसेच कोणत्या कामाबाबत चौकशी करत आहेत, याची माहिती गुत्तेदारास नेमकी कोणत्या कर्मचारी अथवा अधिकाऱ्याने दिली, याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक असल्याची मागणी करण्यात येत आहे.
पत्रकार संरक्षण कायद्याची गरज अधोरेखित
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असतानाही अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हा कायदा केवळ कागदावरच आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. पत्रकारावर हल्ला करणे म्हणजे थेट लोकशाहीवर हल्ला असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केले आहे. पत्रकार मानकर यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत, गुत्तेदार श्री. बांगड यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, त्यांच्यापासून स्वतःस व दैनिकाच्या प्रतिनिधींना संरक्षण द्यावे, माहिती लीक करणाऱ्या कर्मचाऱ्याची चौकशी करून त्याच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
पत्रकार संघटनांचा इशारा
या घटनेनंतर जालना जिल्ह्यातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या असून, तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी दिला आहे. “आज एका पत्रकारावर हल्ला झाला आहे, उद्या हा धोका प्रत्येकावर येऊ शकतो,” त्यामुळे पत्रकारांनी संघटीत होऊन कारवाई करण्यासाठी एकजूट दाखवावी,प्रशासनाची कसोटीही घटना केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून, भ्रष्टाचारविरोधी लढ्याशी निगडित आहे. प्रशासनाने या प्रकरणात किती गांभीर्याने दखल घेतली, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जर अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर वेळीच कारवाई झाली नाही, तर पत्रकार निर्भयपणे काम कसे करणार? असा प्रश्न उपस्थित होत असून, तात्काळ कठोर कारवाई हीच लोकशाहीच्या संरक्षणाची हमी ठरेल.