
जालना जिल्ह्यात 19 मार्च रोजी ‘यलो अलर्ट’ नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जालना, प्रतिनिधी: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या अंदाजानुसार जालना जिल्ह्यात येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेणे गरजेचे आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी हवामान विभागाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष देऊन स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात 17 व 18 मार्च रोजी जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 19 मार्च रोजी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विजांचा कडकडाट आणि वादळी वारे सुरू असताना घराबाहेर पडणे टाळावे. झाडे, विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि उंच बांधकामांपासून दूर राहावे. मेघगर्जना होत असताना मोकळ्या मैदानात किंवा झाडाखाली उभे न राहता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. वीज कडकडत असताना घरातील विद्युत उपकरणांचा वापर शक्यतो टाळावा. शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत. पाळीव प्राण्यांना सुरक्षित गोठ्यात बांधावे. वाहनचालकांनी पावसाच्या वेळी वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवावा आणि सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करावे. असेही कळविले आहे.
*-*-*-*-



