
खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान्य खरेदीस प्रारंभ शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन
अहिल्यानगर, प्रतिनिधी- राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई मार्फत खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मका, बाजरी, रागी, ज्वारी (मालदांडी व संकरीत) या पिकांची खरेदी सुरू करण्यात आली आहे. याची नोंदणी दि. १ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत करता येईल, तर प्रत्यक्ष खरेदी दि. १ मे २०२६ ते ३० जून २०२६ पर्यंत राहील, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एच.डी. पवार यांनी दिली आहे.
भरडधान्यांचा हमीभाव खालीलप्रमाणे :
मका २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल, बाजरी २ हजार ७७५ रुपये, रागी ४ हजार ८८६ रुपये, ज्वारी मालदांडी ३ हजार ७४९ रुपये व ज्वारी संकरीत ३ हजार ६९९ रुपये या दराने खरेदी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कृषी विभागामार्फत प्राप्त पीक पेरणीच्या माहितीनुसार मका व ज्वारी खरेदीसाठी विविध खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी व प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच ज्या तालुक्यांमध्ये अद्याप खरेदीदार संस्था नाहीत, त्या तालुक्यांना जवळील खरेदी केंद्रांशी जोडण्यात आले आहे.
जिल्ह्यात अहिल्यानगर तालुक्यासाठी साईकृपा पणन सहकारी संस्था; श्रीगोंदा तालुक्यासाठी संभाजीराजे बहुउद्देशीय सहकारी संस्था (घुटेवाडी), सखुबाई विविध कार्यकारी सेवा सोसायटी (घोगरगाव) व श्रीदत्तकृपा पणन सहकारी संस्था मर्यादित (घारगाव); कर्जत तालुक्यासाठी अंध दिव्यांग उद्योजक सेवाभावी संस्था (मिरजगाव); पाथर्डी तालुक्यासाठी अकोले परिसर सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्था (अकोले) तर कोपरगाव तालुक्यासाठी बहादराबाद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी (रांजणगाव देशमुख) येथे नोंदणी व खरेदी केली जाणार आहे.
तसेच पारनेर, राहाता व राहुरी या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना जवळील खरेदी केंद्रांशी संलग्न करण्यात आले असून, श्रीगोंदा केंद्राशी पारनेर, कोपरगाव केंद्राशी राहाता आणि पाथर्डी केंद्राशी राहुरी तालुके जोडण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित तालुक्यांतील शेतकऱ्यांनी जवळील खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करून आपल्या पिकांची विक्री करावी, असेही कळविण्यात आले आहे.
00000
0



