बुलढाणा प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना” अंतर्गत शैक्षणिक सत्र 2025-26 साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 4 मे 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जाते. विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक खर्चासाठी आवश्यक रक्कम थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.
या योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी शासनाने 26 डिसेंबर 2024 रोजीच्या निर्णयानुसार योजनेचा विस्तार तालुकास्तरावरही केला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर लॉगिन करून अर्जाची सद्यस्थिती तपासावी. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज Send Back झाले आहेत त्यांनी आवश्यक त्रुटी दुरुस्त करून 4 मे 2026 पूर्वी अर्ज पुन्हा ऑनलाईन सादर करावा. अर्ज फॉरवर्ड करण्यापूर्वी बँक खाते क्रमांक, IFSC कोड, खातेधारकाचे नाव यांसारखे तपशील अचूक भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरला आहे परंतु अर्जाची हार्डकॉपी व आवश्यक कागदपत्रे अद्याप कार्यालयात जमा केलेली नाहीत, त्यांनीही 4 मे 2026 पर्यंत ती सादर करावीत, असे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी कळविले आहे.