घोडबंदर रोडचे नामकरण मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग करा उपमहापौर कृष्णा पाटील यांची महासभेत प्रस्तावाची सूचना
ठाणे प्रतिनिधी-
वसईच्या ऐतिहासिक लढ्यात पोर्तुगीजांचा पराभव करून मराठा साम्राज्याचा भगवा फडकवणारे थोर पराक्रमी शूर चिमाजी अप्पा यांच्या शौर्याचा आणि स्मृतींचा यतोचित गौरव व्हावा, यासाठी घोडबंदर रोड या महत्त्वपूर्ण मार्गाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केली आहे. तशी प्रस्तावाची सूचना त्यांनी महासभेत मांडली असून याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लेखी पत्रही कृष्णा पाटील यांनी दिली आहे.
ठाणे-वसई-विरार या भागांना जोडणाऱ्या घोडबंदर या मुख्य रस्त्याला चिमाजी अप्पा यांचे नाव द्यावे अशी मागणी होत आहे. या संदर्भात कृष्णा पाटील यांनी महासभेमध्ये प्रस्तावाची सूचना मांडली आहे.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना थेट पत्र
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची आणि ठळक बाब म्हणजे, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महासभेत प्रस्तावाची सूचना मांडण्यासोबतच थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही याबाबतचे विशेष पत्र दिले असून, या मागणीचा उल्लेख त्यांनी पत्रात प्रामुख्याने केला आहे. चिमाजी अप्पांच्या जाज्वल्य इतिहासाची नवतरुण पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी या मार्गाचे नामकरण मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग असेच करण्यात यावे, अशी आग्रही विनंती पाटील यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
इतिहासाचा वारसा जपण्याचा प्रयत्न,चिमाजी अप्पांनी वसईच्या लढ्यात दाखवलेले शौर्य हे मराठ्यांच्या लष्करी इतिहासातील एक सोनेरी पान आहे. त्यांच्या या पराक्रमाची दखल घेऊन घोडबंदर मार्गाला त्यांचे नाव दिल्यास, तो या थोर योद्ध्याला मानाचा मुजरा ठरेल, असा विश्वास उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कृष्णा पाटील यांनी महासभेत मांडलेली प्रस्तावाची सूचना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रानंतर आता महापालिका व शासन स्तरावर यावर काय सकारात्मक निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.