योगामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक शांतता लाभते – महापौर ज्योतिताई गाडे१२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
अहिल्यानगर, प्रतिनिधी: प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होत असताना योगामुळे केवळ शरीर निरोगी राहत नाही, तर मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जाही मिळते. त्यामुळे प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन महापौर ज्योतिताई गाडे यांनी केले.
शहरातील जॉगिंग ट्रॅक येथे महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, काका ट्रस्ट, क्रीडा भारती तसेच विविध योग संस्था आणि क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा भारतीचे चंद्रशेखर कुलकर्णी, अभय महाजन, डॉ. साताळकर, डॉ. हर्षवर्धन तन्वर, गिरीश कुलकर्णी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते निर्मल थोरात, सुनील जाधव, मनीषा पुंडे, कोमल वाकळे, शैलेश गवळी, संजय साठे, मनीष राठोड आदी उपस्थित होते.
या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते म्हणाले, योग ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असून शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक आहे. योगामुळे निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास मदत होते. जिल्हावासीयांनी नियमित योग करून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून भारताला अकरा सुवर्णपदके मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील योगासन खेळाडूंचा गौरव करण्यात आला. रोहन तायडे, प्रणव साळवे, तृप्ती गोरे, ऋद्धी भावे, सिद्धी चोरे आणि प्रांजल वाघाणी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशिक्षक मंगेश खोपकर, मृणाली वाघोले, रेशमा शर्मा तसेच तांत्रिक अधिकारी उमेश झोटिंग, कुलदीप काकडे आणि प्रणिता तरोटे-कवडे यांचाही गौरव करण्यात आला.
एम. एम. वाय. टी. सी. संस्थेच्या योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रार्थना, सूक्ष्म व्यायाम, विविध योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे सामूहिक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत योगाभ्यासात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.
या कार्यक्रमास महानगरपालिकेचे नगरसेवक व नगरसेविका, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, खेळाडू आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा भारतीचे वेदपाल तन्वर, सुधीर चपळगावकर, अमोल धोपावकर, कीर्ती धोपावकर यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी प्रियांका खिंडरे, रंजन तडवी, प्रवीण कोंढावळे, विशाल गरजे, संतोष वाबळे, रमेश जगताप, अवधूत शेजुळ, सागर पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.