
ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालयांतस्वातंत्र्यदिनी तंबाखूमुक्तीची शपथ द्यावी – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना
सांगली, प्रतिनिधी: जिल्ह्यातील युवा पिढी तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कालबद्ध कृती आराखडा तयार करून त्यानुसार प्रभावी कार्यवाही करावी. स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. एम. आलासकर, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, सेवाभावी संस्थेचे रविंद्र कांबळे, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, वसंतदादा डेंटल कॉलेजचे डॉ. अनिरुद्ध पाटील, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी आर. जी. टोणे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाबासाहेब उजगरे आदी उपस्थित होते
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या समन्वयाने नियमित तपासण्या करण्यात याव्यात. शाळांच्या 100 मीटर परिसरात पानटपरी अथवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही, याची तपासणी करून अहवाल सादर करावा. तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये आरोग्य तपासणीसोबतच तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.
यावेळी जिल्हा सल्लागार डॉ. एम. आलासकर यांनी कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसह राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 9 आरोग्य संस्थांमध्ये तंबाखूमुक्ती समुपदेशन केंद्रे कार्यरत असून एप्रिल ते जून 2026 या कालावधीत 548 रुग्णांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी 9 जणांनी तंबाखूचे व्यसन पूर्णपणे सोडले आहे. तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ (जाहिरात प्रतिबंध व व्यापार, उत्पादन, पुरवठा व वितरण नियमन) अधिनियम, 2003 (कोटपा) अंतर्गत एप्रिल ते जून 2026 या कालावधीत पोलीस व आरोग्य विभागाने संयुक्तपणे 179 व्यक्तींवर कारवाई केली असून त्यांच्याकडून एकूण 37 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
00000



