बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तरीय आराखड्याची नांदीबालहक्क संरक्षण आयोगाच्या पुढाकाराने विविध विभागांची महत्त्वपूर्ण बैठक; शिक्षण, क्रीडा, कला व कौशल्य विकासावर भर
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तरीय आराखड्याची नांदीबालहक्क संरक्षण आयोगाच्या पुढाकाराने विविध विभागांची महत्त्वपूर्ण बैठक; शिक्षण, क्रीडा, कला व कौशल्य विकासावर भर
जालना (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील बालकांचा सर्वांगीण विकास, त्यांच्या अंगभूत गुणवत्तेची योग्य ओळख आणि लहान वयापासूनच त्यांच्या आवडीनिवडीनुसार शिक्षण, कला, क्रीडा, संस्कृती, कौशल्य व तंत्रज्ञान क्षेत्रात भक्कम पाया उभारण्यासाठी राज्यस्तरावर एकात्मिक धोरण तयार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक पुणे येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध महामंडळे, संशोधन संस्था तसेच शिक्षण आणि महिला-बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेत बालकांच्या भविष्यासाठी समन्वित कृती आराखडा तयार करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. बालकांच्या सुप्त गुणांना योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांना विविध क्षेत्रांत सक्षम बनविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
याबाबत माहिती देताना महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांनी सांगितले की, बालकांच्या कल, क्षमता आणि आवडीनुसार त्यांचा विकास साधण्यासाठी विविध विभाग आणि संस्थांच्या माध्यमातून एकसंध धोरण राबविण्याच्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. भविष्यात या चर्चेच्या आधारे ठोस आराखडा तयार करून राज्यभर प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. बैठकीस महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक, सदस्य गीतांजली बुटी, शुभांगी तांबट, मिलन जंगम, प्रवीण बुजाडे, अतुल देसाई तसेच प्रशासकीय अधिकारी वंदना जैन उपस्थित होत्या. याशिवाय बार्टी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, सारथी, महाज्योती, शबरी आर्थिक विकास महामंडळ, परशुराम आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळ, शालेय शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्या संशोधन व प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही बैठकीत सहभाग नोंदविला. बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध विभाग आणि संस्थांना एका व्यासपीठावर आणणारी ही बैठक राज्यातील बालविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून, आगामी काळात याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.