
राज्यात 99.26 टक्के ऊस उत्पादकांना एफआरपी अदा;उर्वरित 298 कोटी व्याजासह वसूल करणार- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 99.26 टक्के एफआरपी अदा केली असून, उर्वरित 298 कोटी रुपयांची थकबाकी व्याजासह वसूल करण्यात येईल असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या सांगितले. याबाबत सदस्य सदाभाऊ खोत यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्राजक्त तनपुरे, प्रवीण दरेकर, गोकुळ गीते, श्रीकांत भारतीय यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, राज्यातील 210 साखर कारखान्यांपैकी 162 कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी, 43 कारखान्यांनी 80 ते 99 टक्के, 2 कारखान्यांनी 60 ते 80 टक्के, तर 3 कारखान्यांनी 60 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी अदा केली आहे. सन 2022-23 हंगामातील एफआरपीची 298 कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक असून, संबंधित कारखान्यांविरोधात कारवाई सुरू आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपी अदा केलेली नाही, त्यांच्याविरोधात आरआरसी ची कार्यवाही करण्यात आली असून, थकबाकी व्याजासह वसूल केली जाईल.
सहकार मंत्री पाटील म्हणाले की, साखर उद्योगासमोरील अडचणींबाबत मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार अमित शाह यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली असून, त्यामध्ये ऊसाचा एफआरपी आणि साखरेचा किमान विक्री दर परस्परांशी जोडण्याची, इथेनॉलच्या दरात वाढ करण्याची तसेच ग्रीन-बेस इथेनॉलसाठी दरातील तफावत कमी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आले आहे. साखर उद्योग आर्थिक अडचणीत असला तरी शेतकऱ्यांच्या एफआरपीला प्राधान्य दिले जाईल. राज्यातील सुमारे 40 हजार कोटी रुपयांच्या एफआरपीपैकी केवळ 298 कोटी रुपये प्रलंबित असून, ही उर्वरित रक्कमही शेतकऱ्यांना लवकरात लवकर अदा करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले
0000



