
अंतर्गत रानभाजी पदार्थ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित ‘उत्सव रानभाज्यांचा जागर वसुंधरेचा’ या उपक्रमांतर्गत पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे औषधी गुणधर्म आणि महिलांच्या पाककौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिवेआगर येथील श्री. सुहास बापट यांच्या सभागृहात रानभाजी पदार्थ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत परिसरातील १६ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात परीक्षकांचे हळद-कुंकू, पुष्पगुच्छ, बॅच व गजरा देऊन पारंपरिक पद्धतीने स्वागत करून करण्यात आली. त्यानंतर भारतमाता पूजन व अन्नपूर्णा पूजन करण्यात आले. श्रीमती जोगळेकर व उपस्थित महिलांनी अन्नपूर्णा स्तोत्राचे सामूहिक पठण करून कार्यक्रमास भक्तिमय वातावरणाची जोड दिली. यावेळी श्रीमती जोगळेकर यांनी परीक्षक सौ. वृंदा विनायक मराठे व सौ. उर्मिला श्रीनिवास केळकर यांचा परिचय करून देत त्यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
यानंतर अमृत संस्थेच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जिल्हा व्यवस्थापक श्री. शैलेश विनायक मराठे तसेच उपव्यवस्थापक श्री. मंगेश भागुराम ढेबे यांनी उपस्थित महिलांना दिली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अमृत संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेत सहभागी महिलांनी पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या विविध पारंपरिक रानभाज्यांपासून पौष्टिक, स्वादिष्ट व आकर्षक पदार्थ तयार करून सादर केले. परीक्षकांनी पदार्थांची चव, पौष्टिकता, पारंपरिकता, सजावट, मांडणी आणि सादरीकरण या निकषांवर परीक्षण करून गुणांकन केले. विशेष म्हणजे, कांदा-लसूण न वापरता पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या रानभाजी पदार्थास प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच सर्व सहभागी महिलांना सहभाग प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. याशिवाय, इतर सहभागी महिलांनाही सहभाग प्रमाणपत्रासह आकर्षक भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
यावेळी उपस्थित महिलांनी अमृत संस्थेचे आभार व्यक्त करत अशा प्रकारचे पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन करणारे, आरोग्यविषयक जनजागृती करणारे आणि महिलांना प्रोत्साहन देणारे उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी बोलताना जिल्हा व्यवस्थापक श्री. शैलेश विनायक मराठे म्हणाले की, या स्पर्धेचा उद्देश केवळ महिलांच्या पाककौशल्याला प्रोत्साहन देणे नसून अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणे हाही आहे. घरातील अन्नपूर्णा असलेल्या महिलांपर्यंत एखाद्या योजनेची माहिती पोहोचल्यास ती संपूर्ण कुटुंबापर्यंत आणि समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचते. त्यामुळे महिलांच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा व्यापक प्रसार होण्यास मदत होते.



