vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंचगंगा नदी परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती द्या   – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे,राज्यातील सर्वच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे निर्देश..

पंचगंगा नदी परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती द्या   – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे,राज्यातील सर्वच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे निर्देश..

मुंबई, द प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदी परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी उभारण्यात येत असलेल्या सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. तसेच या कामास उशीर का झाला, याचा अहवाल देण्याचे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. तसेच कोल्हापूरसह राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील रेड झोन, साखर कारखाने, प्रदुषित क्षेत्रातील सर्व सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता, प्रत्यक्ष वापर, तसेच या प्रकल्पांचा वापर करणे अपेक्षित असलेल्या आणि प्रत्यक्ष वापर करणाऱ्या औद्योगिक घटक आदींचे ऑडिट करून त्याचा अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या प्रदूषणासंदर्भात मंत्री मुंडे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार आदी उपस्थित होते. तर राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी तसेच कोल्हापूर महापालिका आयुक्त राजेंद्र भारूड आदी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

कोल्हापूरमधील पंचगंगा नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. तसेच कोल्हापूर शहर, इचलकरंजी तसेच नदी परिसरातील, नगरपालिका, ग्रामपंचायती तसेच औद्योगिक क्षेत्रातून पंचगंगा नदीमध्ये जाणाऱ्या सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाचा आढावा घेण्यात आला.

प्रस्तावित नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाच्या कामामध्ये पंचगंगा नदीचा प्राधान्याने समावेश करून कामे हाती घेण्यात येणार असल्याचे सांगून मंत्री मुंडे म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच औद्योगिक विकास महामंडळामार्फत सुरू असलेली मंजूर सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची यांत्रिकीकरणाची कामे आणि त्यांना जोडणाऱ्या पाइपलाइनची कामे एकाच वेळी सुरू राहिली पाहिजेत. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधितांना आदेश जारी करून त्याची प्रत सादर करावी. औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया झाली तरी त्याची विल्हेवाट लावताना ते शेतजमिनी, नाले अथवा अन्य मार्गांनी पुन्हा नदीत पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ प्रक्रिया प्रकल्पांचे निष्कर्ष न पाहता सांडपाण्याची प्रत्यक्ष विल्हेवाट, वाहतुकीदरम्यान होणारी गळती आणि अनधिकृत विसर्ग यावरही प्रभावी देखरेख ठेवण्याची आवश्यकता आहे.

राज्यातील सर्वच ठिकाणी असलेले सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रत्यक्षात किती क्षमतेने सुरू आहेत आणि औद्योगिक युनिट्सकडून त्यांचा किती वापर केला जातो, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात यावी. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुरू असलेल्या चार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूरच्या परिघीय शहरी गावांमधील सांडपाणी व्यवस्थापनासाठी संबंधित विभागांची स्वतंत्र बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. विविध विभागांच्या अभिसरणातून या गावांसाठी योजना तयार करण्याच्या शक्यतांचा विचार करावा, असे मंत्री मुंडे यांनी सांगितले. पंचगंगा नदीच्या प्रदूषणासंदर्भात पुढील आठवड्यात कोल्हापूर येथे बैठक घेणार असल्याचेही मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, अनेक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाणी खराब असते. त्यामुळे त्या पाण्याचा वापर होऊ शकत नाही. त्यामुळे राज्यातील अनेक केंद्रीभूत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी त्या दर्जाचे आहे का?, तसेच हे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत का याची पाहणी करणे आवश्यक आहे. तसेच किती औद्योगिक पाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जाते याचे सर्वेक्षण करण्यात यावे.

यावेळी आमदार महाडिक, आवाडे, यड्रावकर तसेच माजी खासदार राजू शेट्टी आदींनीही नदी प्रदूषणासंदर्भात चर्चा केली.

 

0000

संबंधित पोस्ट

महिलांचा देशाच्या प्रगतीत व नवीन पिढी घडवण्यात, त्यांच्यापुढे आदर्शठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा : डॉ. देवेश पाथ्रीकर

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट

नांदेड तालुक्यातील लिंबगाव महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न 

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 6 जूनला जिल्ह्यात ‘मेगा कृषी क्रेडिट आउटरीच कॅम्प’सर्व 45 शाखांमध्ये जागेवरच होणार कर्जवाटप

शिवकालीन वारसा पर्यटनाला मिळणार नवी ओळख**किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीरजीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार* *प्रथम टप्प्यात १ कोटींचा निधी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई*

केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (CBN) ‘ऑपरेशन ब्लॅक हॉक्स’ अंतर्गत आंतरराज्य हेरॉईन तस्कर टोळीचा पर्दाफाश केला, 18.6 किलो कच्चे हेरॉईन जप्त आंतरराज्य टोळीच्या 3 प्रमुख सदस्यांना अटक