
गांधी चमन येथे ब्राह्मण समाजाचे दीपक रणवरे यांचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले असून भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले यावेळी निवासी जिल्हाधिकारी श्री रामदास दौंड पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी तहसीलदार धैर्यशील गवळी यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्या शासन दरबारी मान्य चे लेखी आश्वासन दिले,जालन्यात ब्राह्मण समाजाचे दीपक रणनवरे यांचे आमरण उपोषण मागे
*भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मध्यस्थीला यश; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक
जालना (प्रतिनिधी) — ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून जालना शहरातील गांधी चमन येथे आमरण उपोषणाला बसलेले समाजनेते दीपक रणनवरे यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले. भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन शासन आणि आंदोलक यांच्यात समन्वय साधल्याने या आंदोलनाची सांगता झाली.
उपोषणाच्या सहाव्या दिवशी रणनवरे यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर राम कुलकर्णी यांनी या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या निदर्शनास ब्राह्मण समाजाच्या मागण्यांचा विषय आणला. त्यानंतर कुलकर्णी यांनी स्वतः जालना येथे येऊन गांधी चमन येथील उपोषणस्थळी भेट दिली.
यावेळी कुलकर्णी यांनी दीपक रणनवरे यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्या शासनाच्या संबंधित विभागांपर्यंत प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. शासनाचे प्रतिनिधी म्हणून निवासी जिल्हाधिकारी श्री. रामदास दौंड , पोलिस उप अधीक्षक अनंत कुलकर्णी, तहसीलदार धैर्यशील गवळी उपस्थित होते. त्यांनी रणनवरे यांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचे लेखी आश्वासन दिले.मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक
*******
ब्राह्मण समाजाच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत लवकरच बैठक आयोजित करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. शासन सकारात्मक भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रणनवरे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
दीपक रणनवरे यांनी उपोषणादरम्यान परशुराम आर्थिक विकास महामंडळाला पुरेसा निधी उपलब्ध करून देणे, महामंडळावर अशासकीय सदस्य व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणे, ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, ईडब्ल्यूएस आरक्षणाची उत्पन्न मर्यादा वाढविणे तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे मोफत सुरू करणे आदी मागण्या शासनाकडे केल्या होत्या.
गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग केल्यामुळे रणनवरे यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप होणे आवश्यक होते. राम कुलकर्णी यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे शासनाचे प्रतिनिधी आणि आंदोलक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आणि आंदोलनाची कोंडी फुटली.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन दीपक रणनवरे यांनी आमरण उपोषण सोडल्याची घोषणा केली.



