
भरडधान्य जनजागृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन- जेईएस महाविद्यालयात आयोजित महोत्सवास उत्स्फुर्त प्रतिसाद- जनजागृतीपर भव्य रॅलीने शहर दुमदुमले
– भरड धान्य विक्री व खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी- मार्गदर्शकांनी तृणधान्याचे महत्त्व केले विषद
– तृणधान्यपासून पाककृती, रांगोळी, पोस्टर्सने उपस्थितांचे वेधले लक्ष- सकाळी 10 पासून महोत्सवाला देता येईल भेट
जालना, प्रतिनिधी :- निरोगी शरीरासाठी भरडधान्य (पौष्टिक तृणधान्य) अत्यंत गरजेचे आहे. दररोजच्या आहारात भरडधान्यापासून बनविलेले पदार्थ जरुर खावेत. मीठ, साखर, तेल कमी आरोग्याची हमी. नाचणी/रागी/नागली, वरई, राळा, कोद्रो, सावा, सामा, भगर, ज्वारी, बाजारी, राजगिरा या पौष्टिक तृणधान्याचा जेवणात अवश्य समावेश करावा. मुलांना तृणधान्याचे महत्त्व समजून सांगावे, अशा प्रतिक्रीया भरड धान्य मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या मनोगतातून व्यक्त झाल्या.
जालना शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या परिसरात अतिशय भव्य प्रमाणात आयोजित दोन दिवसीय भरड धान्य जनजागृती महोत्सवाचा आज थाटात प्रारंभ झाला. महाविद्यालयाच्या मैदानावर सुमारे तीस स्टॉलच्या माध्यमातून भरड धान्य विक्री, खाद्य पदार्थांचे स्टॉल, भरड धान्याचे महत्त्व सांगणारे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी या मेळाव्यास नागरिक, विद्यार्थी यांचा मोठा प्रतिसाद लाभला. प्रत्येक स्टॉलला भेट देणाऱ्यांची मोठी गर्दी होती.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त अन्न व औषध प्रशासन, जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय आणि जालना एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “भरड धान्य जनजागृती महोत्सवा”चे आयोजन करण्यात आले आहे. उदघाटन कार्यक्रमास प्रभारी अपर जिल्हाधिकारी सरीता सुत्रावे, अन्न व औषधी प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचे सह आयुक्त अर्जुन भुजबळ, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जी.आर. कापसे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दयानंद पाटील, प्रमुख वक्ते शशिकांत बोडखे, जेईएस एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, कोषाध्यक्ष हेमेंद्र लखोटिया, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष विनीत सहानी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
श्रीमती सुत्रावे म्हणाल्या की, भरडधान्य शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे. या धान्याची उत्पादकता वाढावी व त्याचा दैनंदिन आहारात समावेश व्हावा, यासाठी शासनाने हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून शासन हे तृणधान्याची मोठया प्रमाणात जनजागृतीही करीत आहे. तृणधान्यामुळे उत्तम आरोग्य राहण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्नातही भर पडेल. मुलांच्या आहारात जास्तीतजास्त तृणधान्याचा वापर करावा. व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांनी भरडधान्याची विक्री व त्यापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांच्या विक्रीवर भर द्यावा.



