
आनंदमय वातावरणात निरंकारी संत समागमाची सांगता,दिव्य गुणांचा अंगीकार करुन यथार्थ मानव बनावे-सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज
जालना- प्रतिनिधी अध्यात्मिक वार्ता मधुरता यांसारख्या दिव्य गुणांचा अंगीकार करुन मन-वचन-कर्माने आपण यथार्थ मानव बनावे, असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नागपुर येथे आयोजित तीन दिवसीय निरंकारी संत समागमाच्या समापन सत्रामध्ये उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित करताना व्यक्त केले. आपली अद्वितिय छाप उमटवत अगदी आनंदमय वातावरणात रविवारी या तीन दिवसीय संत समागमाची यशस्वी सांगता झाली.
समर्पण भावनेविषयीं सद्गुरु माताजींनी समजावले की, आपण आपला मीपणा व अहंकार यांचा पूर्णपणे त्याग करुन समर्पित भावनेने या परमात्म्याशी एकरुप होतो तेव्हा आपल्या मनात खर्या अर्थाने शांती व अलौकिक आनंदाची अनुभूती प्राप्त होते आणि मग हा परमानंद आपल्या व्यवहारामध्येही दृष्टिगोचर होऊ लागतो. मग अवघ्या जगातील समस्त प्राणी आपले वाटू लागतात आणि आपले जीवन मानवतेच्या दिव्य गुणांनी सुगंधित होऊन जाते. शेवटी सद्गुरु माताजींनी सांगितले, की जितके जितके आपण या निराकार प्रभूशी जोडले जाऊ तितके तितके आमच्यातील वास्तविक मनुष्यत्व प्रकट होत जाईल. हीच मानवता आपण जीवंत ठेवायची आहे. ब्रह्मज्ञानाद्वारे क्षणोक्षणी या परमात्म्याची जाणीव ठेवून भक्तीमय जीवन आपण जगायचे आहे. बहुभाषी कवी संमेलन हे समागमाच्या तृतीय दिवसाचे मुख्य आकर्षण होते. या कवी संमेलनात ’शांती अंतर्मनाची’ या विषयावर आधारित मराठी, हिन्दी, कोंकणी, पंजाबी, भोजपुरी, इंग्रजी व उर्दू भाषांमध्ये 22 कवींनी आपापल्या कविता सादर केल्या ज्याचा उपस्थित श्रोतावर्गाने आनंद घेतला आणि प्रशंसाही केली. समागमाच्या अंतिम सत्रामध्ये संत निरंकारी मंडळाचे मेंबर इंचार्ज ( प्रचार-प्रसार) श्री. मोहन छाब्राजी यांनी सद्गुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांचे नागपुर नगरीला संत समागम देऊन कृतार्थ केल्याबद्दल हार्दिक आभार व्यक्त केले. तसेच पुढील वर्षीचा महाराष्ट्राचा वार्षिक निरंकारी संत समागम पुण्याच्या धरतीवर आयोजित केला जाणार असल्याचे सांगितले.



