मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्यास राज्यभर आंदोलन छेडणार -माजी खासदार हरिभाऊ राठोड
मुंबई प्रतिनिधी सुरेश गायकवाड –
मुंबई- महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून संधी उपलब्ध करून दिल्याने ते बेरोजगार युवकांनी या प्रशिक्षण कालावधीत विविध शासकीय विभागात कार्यरत राहून आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडीत संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे आपले काम पार पाडले आहे. परंतु या प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी सहा महिन्याचा असल्याकारणाने फेब्रुवारीमध्ये हा कालावधी संपल्यानंतर ते सर्व युवक बेरोजगार होणार असल्याची भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. अशा प्रशिक्षणार्थीना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे व मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहिर केल्याप्रमाणे यांना नियमित करण्यात येईल असे आश्वासन दिले होते याची आठवण करून देण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले, परंतु सरकारने अद्यापही निर्णय घेतला नाही.
त्यामुळे संपूर्ण राज्यभर असणाऱ्या या युवक-युवतीमध्ये सरकारबद्दल नाराजीचा सूर आहे. तरी सरकारने या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून किमान त्यांचा कालावधी वाढवून आहे, त्या आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावून घेण्याबाबत विचार करावा. मंत्रालयीन स्तरावर प्रशिक्षणर्थ्यांचा कालावधी वाढविण्याबाबत चर्चा आहे, परंतु जोपर्यंत जीआर निघत नाही तोपर्यंत युवक मानण्यास तयार नाही, येणाऱ्या दोन दिवसात शासनाने जीआर काढावा, अन्यथा येणाऱ्या काळात राज्यभर हे युवक – युवती संविधा निकरित्या आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी खासदार हरिभाऊ राठोड, तसेच सामाजिक नेते बालाजी चाकूरकर पाटील यांनी आज मुंबईमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मुदत वाढीसह समायोजनाकरिता आणि मानधनात वाढ करण्याकरिता होत असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाची रूपरेषा अशी असेल – संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा धडक मोर्चा दि. ३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वा मुंबई येथील आझाद मैदानावर धडकेल, सकाळी ११ वा लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर १०१ प्रशिक्षणार्थीसह आमरण उपोषणास प्रारंभ करतील. आझाद मैदानावरील उपोषणास पाठींबा म्हणून महाराष्ट्रातील सर्व तहसिल कचेरी समोर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी दररोज धरणे आंदोलन करतील. आमरण उपोषणाच्या आठव्या दिवशी १० मार्च २०२५ रोजी सोमवारी उपोषणाची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ आझाद मैदानावर १ हजारपेक्षा जास्त प्रशिक्षण घेतलेले युवक मुंडण करून निषेध नोंदवतील. उपोषणाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच १२ मार्च २०२५ रोजी बुधवारी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवास स्थानाला घेराव घालतील. उपोषणाच्या पंधराव्या दिवशी म्हणजेच १७ मार्च २०२५ रोजी सोमवार सकाळी अकरा वाजता आंदोलन करते प्रशिक्षणयुक्त प्रशिक्षणार्थी मुंबई येथील मंत्रालयाला घेराव घालतील अशी माहिती त्यांनी दिली आहे.