vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

युवकांनी गाजविला ‘जागर’चा ‘भिमा तुझ्या जन्मामुळे…’ व्याख्यान उपक्रम…

युवकांनी गाजविला ‘जागर’चा ‘भिमा तुझ्या जन्मामुळे…’ व्याख्यान उपक्रम…

 

     नवी मुंबई प्रतिनिधी     ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजल्या जाणा-या ऐरोली नवी मुंबई येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून 2 एप्रिलपासून सुरू असलेल्या ‘जागर’ या व्याख्यानमालेची सांगता विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजविणा-या 4 युवा पिढीतील प्रतिनिधींच्या सुसंवादाने झाली. ‘भिमा तुझ्या जन्मामुळे…’ या शिर्षकांतर्गत आयोजित या युवा सुसंवाद कार्यक्रमाला श्रोत्यांची उत्तम दाद मिळाली.  महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना बाबासाहेबांचे अनेक क्षेत्रातील महनीय कार्य सर्वांपर्यंत पोहचावे व यामधून प्रेरणा घेता यावी यादृष्टीने आयोजित करण्यात आलेली ‘जागर’ व्याख्यानमालेची संकल्पना नागरिकांनी उत्साही प्रतिसाद दिल्याने यशस्वी झाली याचा आनंद व्यक्त केला. हे संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष असून यामध्ये ‘हर घर संविधान’ अंतर्गत अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये मुंबई विद्यापीठाचा सहयोग घेण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती ध्यानात घेऊन येथील समृध्द ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, भांडार विभागाचे उपआयुक्त श्री.शंकर खाडे, लेट्स रीड फाऊंडेशनचे प्रमुख तथा लेखक श्री.प्रफुल्ल वानखेडे उपस्थित होते.

भिमा तुझ्या जन्मामुळे…’ या युवा सुसंवादात जागतिक किर्तीचे व्याख्याते – लेखक ॲड.निखिल अडसुळे यांनी बाबासाहेबांकडून कोणते गुण घ्यायचे तर प्रज्ञा, शील व करूणा. या त्रिसूत्रीची मांडणी करताना प्रत्येक गुणाविषयी बाबासाहेबांच्या जीवनपटातील विविध उदाहरणे देत त्यांचे महत्व त्यांनी विशद केले. हॉवर्ड, शिकागो, लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स आणि परदेशात विविध ठिकाणी आपण दिलेल्या व्याख्यानांचे अनुभव सांगत त्यांनी बाबासाहेबांची महती उलगडली.

 युवा उद्योजक, गिर्यारोहक श्री.आनंद बनसोडे यांनी बाबासाहेबांच्या फोटोकडे बघून असे व्हायला व्हावे हे लहानपणापासून मनात ठसले आणि जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीशी झुंजा देत केलेला आपला जीवनप्रवास उलगडला. लहानपणी वाळूच्या ढिगा-यावर खेळण्यापासून माऊंट एव्हरेस्ट सर करण्यापर्यंतची त्यांची वाटचाल ऐकताना “स्वप्ने पाहता यायला हवीत, स्वत:वर विश्वास हवा, मग सारे काही साध्य होते” हे त्यांचे शब्द नवी चेतना देणारे ठरले.   पुस्तके माणसाला खूप काही शिकवतात, त्यासाठी खूप वाचायला पाहीजे असे सांगत युवा उद्योजक व मार्गदर्शक श्री.अश्विन नंदापूरकर यांनी पुस्तके आवडतात कारण मला नवनवीन गोष्टी शिकायला आवडते अशा शब्दात वाचनाचे महत्व अधोरेखित केले. स्मारकातील ग्रंथालय इतके समृध्द आहे की त्याचा उपयोग जास्तीत जास्त करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. पुस्तके आणि प्रवास यामधून माणूस समृध्द होत जातो हे त्यांनी स्वानुभव सांगत उलउलगडले.

  ‘बा भीमा’ या कॉमिक सिरीजचे संकल्पनाकार श्री.सुरज वाघमारे यांनी घरातला बाबासाहेबांचा फोटो पाहून मुलाने “हा कोणाचा फोटो आहे?” हे विचारले, तेव्हा लहान मुलांपर्यंत बाबासाहेबांचे मोठेपण पोहचविण्यासाठी त्यांना आवडेल अशा कॉमिक्स माध्यमाचा वापर करण्याची संकल्पना पुढे आली आणि मग अमर चित्र कथाच्या धर्तीवर पत्नी गीतासह या कॉमिक्स बुक्सची निर्मिती करण्याचे ठरविले असे सांगितले. तरूणाईने आदर्श नीट तपासून घ्यावेत व त्याचे ग्लॅमर न बघता त्या व्यक्तीचा संघर्ष बघावा, म्हणजे आपण घडत जातो असा संदेश दिला.

    चारही वक्त्यांनी विविधांगी अनुभव सांगत बाबासाहेबांची महती, शिक्षणाचे व वाचनाचे आपल्या जडणघडणीतील महत्व तसेच आपापला जीवनप्रवास उलगडवला. समाजाच्या विविध स्तरांतून आलेल्या आणि निश्चित ध्येय नजरेसमोर ठेवून खंबीर वाटचाल करणा-या या चारही युवकांचे अनुभव ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. एकंदरीतच ‘जागर 2025’ व्याख्यानमालेची यशस्वी सांगता या उद्याचे भविष्य असणा-या युवा पिढीच्या आश्वासक सूरांमध्ये झाली. 00000

संबंधित पोस्ट

भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्ताने संविधान हत्या दिवस कार्यक्रम · लोकतंत्र सेनानींचा सत्कार मुंबई, दि. २५ : देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या या वेगवान विकासात लोकशाहीने आपले महत्व अधोरेखित केले आहे. भारतीय परंपरेत मुळे असणारी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण – भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय, संविधान हत्या दिवस २०२५ निमित्ताने लोकतंत्र सेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथील दरबार सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके उपस्थित होते. आणीबाणी ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील सल असल्याचे सांगत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, आणीबाणी ही देशावर लादली गेली. या काळात देशविघातक कार्य झाले. जो कुणी आणीबाणीचा विरोध करेल त्याला कारागृहात डांबले जायचे. असह्य अत्याचार त्या काळात नागरिकांना सहन करावे लागले. आणीबाणीमुळे देशातील लोकशाहीवरच घाला घालण्यात आला. राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली. त्यातूनच आणीबाणीविरोधात जनमत तयार झाले. आपल्या विचारात, कार्यात व भविष्यातील योजनांमध्ये राष्ट्र प्रथम असले पाहिजे. स्वत:साठी न जगता राष्ट्रासाठी जगता आले पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगा, हा मंत्र भारतीय लोकशाहीने दिला आहे. आज जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आहे. भारत विकसित होण्याकडे आगेकूच करीत आहे. विकासाच्या प्रवासाचा इथपर्यंतचा टप्पा हा मजबूत लोकशाहीमुळेच शक्य झाला आहे, त्यामुळे लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने निश्चय केला पाहिजे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रयत्न होता. मात्र लोकतंत्र सेनानींनी मोठा लढा देत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यासाठी सेनानींना मोठा संघर्ष करावा लागला. या लोकतंत्र सेनानींना सन्मानाच्या, कृतज्ञतेच्या भावनेतून मानधन देवून शासन त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बिजे रोवली आहेत. आणि म्हणूनच आणीबाणीमुळे सेनानींचे कुठल्याही प्रकारचे मानसिक खच्चीकरण होवू शकले नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकतंत्र सेनानींचा गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरात सुधारणांसाठी आणीबाणीपूर्वी अनेक आंदोलने सुरू होती. या आंदोलनांचा धसका घेत तत्कालीन राजवटीने देशावर आणीबाणी लादली. ही आणीबाणी संविधानाच्या हत्येचे पातक ठरली. ४२ व्या घटनादुरूस्तीने संविधानाचा आत्माच काढण्याचे प्रयत्न झाले. मुलभूत अधिकार गोठवित मार्गदर्शक तत्वांना महत्व दिले गेले. या काळात भारतीय न्यायव्यवस्थेचेही महत्व कमी करण्यात आले.

हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

बहारदार त्रैभाषिक गझल मुशायर्‍यात रसिक मंत्रमुग्ध

vishwatmaklokswamivarta

रुग्णावरील उपचार दाव्याची रक्कम त्याच महिन्यात अदा करण्यात येणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पुणे येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे-जन आरोग्य सेवा गौरव पुरस्काराचे वितरण

vishwatmaklokswamivarta

गुटखा आणि प्रतिबंधितपदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्याचे होणार निलंबन..

vishwatmaklokswamivarta

चैत्राच्या सोनेरी पहाटेत, आनंदाची गुढी उभारूया, नववर्षाचे स्वागत करूया! गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

vishwatmaklokswamivarta