
काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गतविविध घटकांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
सांगली, प्रतिनिधी : काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
राज्याच्या कृषि उत्पादनात फलोत्पादन पिकांचा महत्वाचा वाटा आहे. फलोत्पादन पिकांचे मूल्यवर्धन / प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पीके / त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत शीतगृह तसेच नवीन तंत्रज्ञान राबविणे व शीतगृह आधुनिकीकरण प्रकल्प उभारणीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. या प्रकल्पाचे अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत असून बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात अनुदान देय राहील.
लाभार्थी पात्रता निकष – वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये किमान 25 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, महानगरपालिका, सहकारी संस्था, सहकारी मार्केटिंग फेडरेशन, लोकल बॉडी, कृषि उत्पन्न बाजार समिती, पणन मंडळ, शासकीय विभाग, ग्रामपंचायत.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये शीतगृह तसेच नवीन तंत्रज्ञान राबविणे व शीतगृह आधुनिकीकरण या घटकांचे मापदंड सुधारित करण्यात आले आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
000000
00000



