
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त कवठेमहांकाळमध्ये युनिटी पदयात्रा उत्साहात
सांगली, प्रतिनिधी: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सरदार @150 एकता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ येथे उत्साहात संपन्न झाली. बाळासाहेब गुरव (बापू) हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे तहसीलदार अर्चना कापसे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला.
मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत 2025 हे वर्ष भारताचे लोहपुरूष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यानिमित्त जिल्हा प्रशासन व मेरा युवा भारत सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही पदयात्रा बाळासाहेब गुरव बापू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथून पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय मार्गे हरिविजय चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – मुख्य बाजार पेठ – म्हसोबा गेट मार्गे काढण्यात येऊन बाळासाहेब बापू गुरव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी पदयात्रेची सांगता झाली. यावेळी गटविकास अधिकारी उल्हास भांगे, जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे, आरोग्य पथकाच्या डॉ. प्रिया पतंगे, कॉलेजचे सचिव वैभव गुरव, मुख्याध्यापक चंद्रकांत घाटे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष माने, नगरपंचायत कवठेमहांकाळचे किरण वाघमारे, प्रशांत होनराव, सर्व शिक्षक, शिक्षिका आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनचरित्रावरील अनंत कुमार साळुंखे सांगली यांच्या शाहिरी पथकाच्या पोवाड्याने झाली. त्यानंतर उमेश चौगुले यांचा राष्ट्रीय एकतेवरील सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यावेळी तहसीलदार अर्चना कापसे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याबद्दल माहिती सांगून एक भारत आत्मनिर्भर भारत चा नारा दिला.
मेरा युवा भारत जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे यांनी प्रास्ताविकात वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली व उपस्थितांना आत्मनिर्भर भारत संकल्प एकतेची शपथ दिली. या पदयात्रेत मेरा युवा भारत सांगली, जिल्हा प्रशासन, नगरपंचायत कवठेमहाकाळ, महांकाली हायस्कूलचे एन.सी.सी चे विद्यार्थी व शिक्षक, स्थानिक युवा मंडळे, आरोग्य विभाग व आरोग्य पथक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी सागर व्हनमाने, महेंद्र साठे, धीरज व्हनमाने यांनी परिश्रम घेतले. सहभागींना अल्पोपहार देऊन समारोप करण्यात आला.
00000



