राज्य प्रतिनिधी -नाशिक आणि गोदावरी काठच्या परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून, सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.
19 हजार क्युसेक विसर्ग झाल्यास गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडते. सध्या गंगापूर धरणातून सुमारे 12 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाच्या पाण्यासह होळकर पुलाजवळून सुमारे 24 हजार क्युसेक प्रवाह वाहण्याचा अंदाज आहे. गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यास सराफ बाजार परिसरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आले आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने धोका काहीसा कमी आहे. मात्र, परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून आवश्यक ती खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे.
अनेक कुटुंबियांना अग्निशामक दलाकडून रेस्क्यू
कळवण, सुरगाणा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील चणकापूर,,कोसूर्ड आंबूर्डी, कनाशी, अभोणा दळवट या भागात अति जोरदार पाऊस वारे वाहत आहेत, सलग दोन दिवस पाऊस पडत असल्याने चणकापूर धरणात झपाट्याने धरणक्षेत्रात वाढ होत. असल्याने गिरणा नदी पात्रता धरणातून 26670क्युसेक पाण्याचं विसर्ग करण्यात आला. शेतात पाणीच पाणी सचलं आहेत, सोयाबीन, मका, भात रोपे आदी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे, छोटे मोठे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, प्रशासनकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कसमादे परिसरातील चणकापूर धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे, हरणबारी धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे गिरणा नदीला पूर आला आणि मालेगाव शहरात भर वस्तीत आता पाणी शिरू लागले. त्यात 15 कुटुंबियांना अग्निशामक दलाकडून रेस्क्यू करण्यात आले. रात्रीतून हा विसर्ग वाढण्याची देखील शक्यता असल्याने नागरिकांना प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन करण्यात आले.