
राजकीय धावपळीतही ‘आजी’ दिसली; पालकमंत्र्यांनी ताफा थांबवला!शिवतीर्थाच्या भिंतीलगत बसलेल्या ८० वर्षीय वृद्धेची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आस्थेवाईक चौकशी; पोलिसांना कुटुंबीय शोधून घरी सोडण्याचे अथवा वृद्धाश्रमात दाखल करण्याचे निर्देश
सातारा, प्रतिनिधी : राजकारणाच्या धावपळीत माणुसकी हरवते, अशी टीका नेहमीच केली जाते. मात्र, शनिवारी साताऱ्यात घडलेल्या एका छोट्याशा प्रसंगाने याला वेगळेच उत्तर दिले. जिल्ह्याच्या राजकीय आणि प्रशासकीय कामांच्या व्यापात असतानाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे लक्ष शिवतीर्थाच्या भिंतीलगत एकाकी बसलेल्या सुमारे ८० वर्षीय वृद्धेकडे गेले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला वाहनताफा थांबवला. ताफ्यातून खाली उतरत थेट त्या वृद्धेजवळ जाऊन त्यांनी तिची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या प्रसंगातून त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडले.
सातारा जिल्हा पोलिसांच्या गणेशोत्सव आयोजनाच्या बैठकीला संबोधित केल्यानंतर पालकमंत्री देसाई शिवतेज हॉल येथून आपल्या निवासस्थानी परतत होते. त्यावेळी शिवतीर्थाच्या भिंतीलगत एक वृद्ध महिला एकटीच बसलेली त्यांना दिसली. वाहन पुढे न नेता त्यांनी तात्काळ ताफा थांबविण्याच्या सूचना दिल्या आणि स्वतः त्या महिलेपर्यंत गेले.‘आजी, तुम्ही कुठून आला? तुमचे गाव कोणते? तुम्हाला कुठे सोडायचे आहे का?’ अशा आपुलकीच्या शब्दांत त्यांनी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, ‘तुम्हाला काही खायचे आहे का?’ अशीही त्यांनी विचारणा केली. अचानक आपल्या भोवती गर्दी जमल्याने वृद्ध महिला काहीशी बावरली होती.‘मी शाहूनगरमध्ये जाते… अंबाबाईचे देऊळ… माझा मुलगा डॉक्टर… दवाखान्यात कामाला आहे,’ एवढेच ती महिला सांगू शकली. तिची अवस्था लक्षात येताच देसाई यांनी तेथे उपस्थित पोलिस यंत्रणेला तातडीने सक्रिय केले.
‘या आजीच्या कुटुंबीयांचा शोध घ्या. त्यांना त्यांच्या घरी सुखरूप सोडा; कुटुंबीय सापडले नाहीत तर शासकीय वृद्धाश्रमात तातडीने व्यवस्था करा,’ असे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.दरम्यान, दोन महिला पोलिस कर्मचारी तातडीने तेथे दाखल झाल्या. मात्र, वृद्ध महिलेभोवती पोलिसांचा मोठा गराडा होऊ नये, अशी सूचनाही देसाई यांनी केली. ‘गर्दी करू नका, घरगुती पद्धतीने आजीची चौकशी करा,’ असे सांगत त्यांनी तिच्याशी संवेदनशीलतेने वागण्याच्या सूचना दिल्या. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्याशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.
महत्त्वाचे म्हणजे, हा प्रसंग कोणत्याही नियोजित कार्यक्रमाचा भाग नव्हता. ना त्यासाठी प्रसिद्धीची तयारी होती, ना कोणताही औपचारिक सोहळा. राजकीय आणि प्रशासकीय कामांच्या धावपळीतून जात असताना रस्त्याकडेला एकटी बसलेली वृद्ध महिला दिसली आणि पालकमंत्र्यांनी आपला ताफा थांबवला—इतकाच हा प्रसंग. त्यामुळेच या कृतीची चर्चा साताऱ्यात रंगलीपालकमंत्री ‘आपल्या दारी’ कार्यक्रम असो, पर्यटन विभागाच्या बैठका असोत किंवा जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि राजकीय कामांचा प्रचंड व्याप असो; या सगळ्या धावपळीतही एखाद्या अनोळखी वृद्धेची व्यथा लक्षात घेऊन ताफा थांबविणे, तिची आपुलकीने चौकशी करणे आणि तिच्या सुरक्षिततेची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश देणे, हा माणुसकीचा वेगळाच पैलू ठरला.
सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीची खरी संवेदनशीलता मोठ्या व्यासपीठावरच्या भाषणातून नव्हे, तर रस्त्याकडेला अडचणीत दिसलेल्या माणसासाठी तो किती क्षण थांबतो, यातून दिसते. शिवतीर्थावर घडलेल्या या प्रसंगात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राजकीय व्यस्ततेपेक्षा एका वृद्धेच्या सुरक्षिततेला दिलेले प्राधान्य चर्चेचा विषय ठरले आहे.
००००



