उत्तर भारतात झालेल्या मोठ्या हिमवृष्टीमुळे आणि पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आता कडाक्याच्या थंडीची चाहूल…
राज्य प्रतिनिधी-
डिसेंबर महिन्यात राज्याच्या किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पारा दोन ते तीन अंशांनी खाली येऊन रात्रीच्या थंडीत आणि पहाटेच्या गारव्यात मोठी वाढ होणार असल्याचा स्पष्ट अंदाज हवामान खात्याने दिला आहे, यामुळे राज्यात हिवाळ्याची जोरदार सुरुवात होईल.
उत्तर भारतात झालेल्या मोठ्या हिमवृष्टीमुळे आणि पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे उत्तरेकडील थंड वारे आता महाराष्ट्राकडे वाहू लागले आहेत. सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान चौदा ते अठरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. मात्र, पुढील आठवड्यात आणि डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात हे तापमान आणखी खाली येण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये तापमानातील घट अधिक स्पष्टपणे जाणवेल. अनेक शहरांचे किमान तापमान बारा ते तेरा अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये पारा दहा अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचू शकतो. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी कडाक्याची थंडी जाणवेल.
विदर्भात थंडीची तीव्रता नेहमीच अधिक असते. डिसेंबरमध्ये येथील किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षाही खाली जाण्याची शक्यता असून, काही भागांमध्ये शीतलहरीचा अनुभव येऊ शकतो. कोल्हापूरसारख्या शहरात नोव्हेंबरमध्येच पारा चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास खाली आला होता. हा पारा गेल्या आठ वर्षांतील नीचांकी होता. डिसेंबरमध्ये हा गारवा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत किमान तापमान साधारणपणे सतरा ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मुंबईकरांनाही बोचरी थंडी अनुभवायला मिळेल.