मुंबईत बिहार भवनला विरोध करण्याची राज ठाकरेंची भुमिका संविधान विरोधी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई प्रतिनिधी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे तशीच ती भारत देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत बिहार भवन, झारखंड भवन बांधण्याला विरोध करण्याची राज ठाकरेंची भुमिका ही संविधान विरोधी भुमिका आहे. राज ठाकरे यांच्या संविधान विरोधी भुमिकेचा आम्ही तिव्र निषेध करतो. महाराष्ट्राला बदनाम करणारी भुमिका राज ठाकरे यांनी घेवू नये, संविधानाने सर्व भारतीयांना देशात कुठेही उद्योग व्यवसाय करुन राहण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे मुंबईत बिहार भवन आणि झारखंड भवन बांधण्याला विरोध करणे हे संविधान विरोधी आहे. जो कोणी बिहार भवन बांधण्याला, झारखंड भवन बांधण्याला विरोध करेल त्यांचा विरोध रिपब्लिकन पक्ष करेल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज दिला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात सर्वांना अन्न, वस्त्र निवा-याचा अधिकार दिला आहे. समता दिलेली आहे, सर्वांना समान अधिकार दिले आहेत. या देशातील कोणताही नागरीक देशांतर्गत कोणत्याही राज्यात वास्तव्य करु शकतो, उदरनिर्वाह करु शकतो. राज ठाकरे मात्र भेदाभेदाची आणि विषमतेची भुमिका घेतात. महाराष्ट्रात उदरनिर्वाहासाठी आलेल्या कामगारांना विरोध करणे चुकीचे आहे. मराठी बोला नाहीतर थप्पड मारु, अशी हिंसक भुमिका घेणं चुकीच आहे. महाराष्ट्रात मुंबईत राहणा-या परप्रांतीयांना मराठी जनतेने सहारा दिलेला आहे, आपुलकीने वागवले आहे. महाराष्ट्राचा देशामध्ये नावलौकीक आहे. मुंबईचा देशामध्ये लौकिक आहे. मुंबई सर्वांना रोजगार देणारी ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईने महाराष्ट्राने देशभरातील जनतेला प्रेम आणि आपुलकी दिली आहे. बंधुभाव दिलेला आहे. राज ठाकरे मात्र तोडण्याची भुमिका घेतात, ती चुकीची आहे. संविधानाने दिलेला अधिकार नाकारण्यासारखे आहे. मुंबईत सर्वांना राहण्याचा अधिकार आहे. बिहार भवन, झारखंड भवनला विरोध करणे चुकीचे आहे. रिपब्लिकन पक्ष हा संविधानाचा रक्षक आहे. जे कोणी बिहार भवन आणि झारखंड भवनला विरोध करतील ते संविधानाला विरोधी भूमिका घेतात असा त्याचा अर्थ होईल असे ना. रामदास आठवले म्हणाले.
राज ठाकरे यांनी अशी संविधान विरोधी भुमिका घेवु नये, महाराष्ट्राचा लौकीक वाढवण्याचे काम करावे. ज्यांना या देशाचे संविधान मान्य नाही त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मुंबईत महाराष्ट्रात जे बिहार भवन, झारखंड भवन बांधण्यात येत असेल तर त्यास राज ठाकरे यांनी विरोध करु नये. प्रांतवादाची भेदाभावाची संविधान विरोधी भुमिका घेवू नये. जे कोणी बिहार भवन आणि झारखंड भवनला विरोध करतील त्यांना विरोध करण्याचे काम रिपब्लिकन पक्ष करेल, असा इशारा ना. रामदास आठवले यांनी आज दिला. हेमंत रणपिसे -प्रसिध्दीप्रमुख