रणवीर राजपूत : पत्रकारितेचे पावित्र्य जपणारा ‘अमृतमहोत्सवी’ कर्मयोगी 1 एप्रिल : निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रणवीर राजपूत यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त विशेष गौरव…
रणवीर राजपूत : पत्रकारितेचे पावित्र्य जपणारा ‘अमृतमहोत्सवी’ कर्मयोगी 1 एप्रिल : निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रणवीर राजपूत यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त विशेष गौरव…
नवी मुंबई प्रतिनिधी- प्रशासकीय सेवेत आणि पत्रकारितेत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे आमचे परममित्र रणवीर राजपूत सर 1 एप्रिल 2026 रोजी वयाची 74 वर्षे पूर्ण करून अमृतमहोत्सवी 75 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. राजपूत सरांचा गेल्या चार दशकांहून अधिक काळाचा प्रवास हा केवळ एक कारकीर्द नसून, तो सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श वस्तुपाठ आहे. त्यांच्या या विशेष दिनी त्यांचे मनस्वी अभिनंदन करतानाच, त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.
राजपूत सरांनी कधीही आर्थिक फायद्याच्या दृष्टिकोनातून पत्रकारिता केली नाही, तर लोकशिक्षण आणि जनजागृती हेच त्यांच्या लेखणीचे मुख्य सूत्र राहिले.
त्यांच्या प्रशासकीय प्रवासाची सुरुवात 1982 मध्ये अनुवादक पदापासून झाली आणि स्वकर्तृत्वावर त्यांनी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क विभागात मोलाची पदे भूषवली. कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि कमालीची पारदर्शकता यांमुळे त्यांनी सनदी अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या याच कार्यशैलीचे कौतुक तत्कालीन महासंचालक भूषण गगरानी साहेब आणि मनिषा म्हैसकर मॅडम यांनी वेळोवेळी केले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या राज्यस्तरीय परिषदेत तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना ‘गुणवंत अधिकारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हे त्यांच्या कर्तव्यपरायणतेचेच फळ होते.
रायगडचे जिल्हा माहिती अधिकारी असताना त्यांनी बजावलेली कामगिरी आजही स्मरणात राहण्यासारखी आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रतापराव दिघावकर यांच्यासोबत मिळून त्यांनी ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव’ मोहिमेत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवला. या यशाची दखल खुद्द तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. (आबा) पाटील यांनी घेतली आणि मंत्रालयात त्यांचा विशेष सत्कार केला. सेवानिवृत्तीनंतरही त्यांची लेखणी थांबली नाही. “माणूस संपेल, पण लेखन कधीच संपणार नाही” या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) सचिव पद समर्थपणे सांभाळले. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यापासून ते प्रवासातील सवलतींपर्यंतचे अनेक प्रश्न त्यांनी शासनदरबारी लावून धरले आणि ते यशस्वीपणे सोडवून घेतले. राजपूत सरांच्या लेखणीचा करिश्मा आजही कायम आहे. ठाणे आणि कोकण-गोवा स्तरावरील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणे असो किंवा कल्याण-डोंबिवली महापालिकेत प्रेस ॲडव्हायजर म्हणून काम करताना जनहितार्थ योजनांवर केलेले लिखाण असो, त्यांचा व्यासंग नेहमीच दिसून येतो. विशेष म्हणजे, आज 75 व्या वर्षीही ते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय मदतीची प्रसिद्धी करण्याचे काम अत्यंत निष्ठेने आणि विनामूल्य करत आहेत. त्यांच्या या सामाजिक तळमळीबद्दल खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना ‘कृतज्ञता पत्र’ देऊन गौरविले आहे. कोरोना काळातील जनजागृतीसाठी त्यांना मिळालेला ‘कोविड योद्धा’ सन्मान, पत्रकारिता क्षेत्रातील ‘जीवन गौरव’ पुरस्कार, आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे मिळालेला ‘ठाणे भूषण’ पुरस्कार हे सर्व त्यांच्या अखंड सेवावृत्तीची साक्ष देतात. शासकीय सेवेतून निवृत्त होऊन 16 वर्षे उलटली तरी, एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने ते आजही लिहित आहेत. त्यांच्या लेखणीतून भविष्यातही असेच लोकशिक्षणाचे कार्य अव्याहतपणे सुरू राहो, हीच आम्हा सर्व प्रियजनांची सदिच्छा! मनोज सुमन शिवाजी सानप-जिल्हा माहिती अधिकारी,ठाणे / रायगड तथा प्र.उपसंचालक,विभागीय माहिती कार्यालय,कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई.0000000000