अहिल्यानगर जिल्हा कारागृहात बंदीवानांसाठी संगणक आणि सौर ऊर्जा प्रशिक्षण
राज्य प्रतिनिधी-सुधारणा आणि पुनर्वसन’ या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देत, अहिल्यानगर जिल्हा कारागृहात बंदीवानांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य विकासाचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर पडून कैद्यांना सन्मानाने जीवन जगता यावे आणि भविष्यात त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी त्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे धडे दिले जात आहेत.
🔸 उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये: कौशल्य प्रशिक्षण: कारागृहातील ६० बंदीवान ‘डाटा एंट्री ऑपरेटर’ (संगणक) आणि ३५ बंदीवान ‘सोलार पीव्ही इन्स्टॉलेशन हेल्पर’ (सौर ऊर्जा) प्रशिक्षण घेत आहेत.संयुक्त विद्यमाने: जिल्हा कौशल्य विकास केंद्र, जनशिक्षण संस्थान व श्री श्री कौशल्य विकास अहिल्यानगर यांच्या सहकार्याने या अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संकल्पना: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली या नाविन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी होत आहे.
🔸 प्रशिक्षणार्थींना होणारे फायदे:प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या कैद्यांना भारत सरकारचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे : शासनाच्या ‘सौरघर योजना’ आणि ‘कुसुम योजनेचा’ लाभ घेता येईल.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध होऊ शकेल.शिक्षा पूर्ण झाल्यानंतर सन्मानाने उदरनिर्वाह करण्याचे आणि एक उत्तम नागरिक म्हणून जगण्याचे साधन प्राप्त होईल.
कधीकाळी चुकीच्या मार्गाला लागलेले हात आता की-बोर्डवर आणि सौर ऊर्जेच्या उपकरणांवर लीलया फिरत आहेत. बंदीवानांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने दिशादर्शक आहे