
अक्षयतृतीयेला सांगली जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील- बालविवाह ठरला किंवा होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलीस विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- नियम मोडल्यास होणार कडक कारवाई वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालयचालक, जाणीव पूर्वक व जबरदस्तीने बाल विवाह केल्यास होणार गुन्हे दाखल
सांगली, प्रतिनिधी: अक्षयतृतीयेचा मुहर्त हा अत्यंत शुभ मानला जातो मात्र या दिवशी छुप्या मार्गाने बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही ग्रामीण व शहरी भागात अक्षयतृतीया (19 एप्रिल ) होणाऱ्या विवाह सोहळयामध्ये बालविवाह होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील यांनी केले आहे.
भारतीय कायद्यानुसार विवाहासाठी मुलाचे वय 21 आणि मुलीचे 18 वर्ष पुर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह केल्यास तो बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार बेकायेदशीर ठरतो. या कायद्याची अमंलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सक्रिय राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गावागावात सरपंच, पोलीस पाटील आणि अगंणवाडी सेविका यांनी सर्तक राहून विवाहापूर्वी मुला – मुलींच्या वयाची खात्री करणे आवश्यक आहे. बालविवाह लावणे हा दखलपात्र गुन्हा असून यात केवळ पालकांवरच नाही तर विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालयचालक, मंडप डेकोरेर्टस जाणीव पूर्वक व जबरदस्तीने बाल विवाह केल्यास गुन्हे दाखल होऊ शकतात. दोषींना २ वर्षे सश्रम कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून संशयास्पद विवाहाची माहिती तात्काळ टोल फ्री 1098 या क्रमांकावर तक्रार देण्याचे आवाहान करण्यात आले आहे.



