बोले तैसा चाले…!अखेर ७० वर्षांनंतर माहुली संगम येथील छत्रपती ताराराणी व थोरले शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचा मार्ग मोकळा१३३ कोटींच्या भव्य स्मारकास मंजुरी; डॉ. संजय लाखेपाटील यांच्या पाठपुराव्याला यश..
बोले तैसा चाले…!अखेर ७० वर्षांनंतर माहुली संगम येथील छत्रपती ताराराणी व थोरले शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचा मार्ग मोकळा१३३ कोटींच्या भव्य स्मारकास मंजुरी; डॉ. संजय लाखेपाटील यांच्या पाठपुराव्याला यश..
जालना (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रम, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याची तेजस्वी परंपरा जपणाऱ्या रणरागिणी मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी आणि छत्रपती शंभूराजे पुत्र थोरले शाहू महाराज यांच्या सातारा जिल्ह्यातील माहुली संगम येथील समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. तब्बल ७० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या पवित्र स्थळाच्या विकासासाठी १३३ कोटी रुपयांच्या भव्य स्मारकास मंजुरी देण्यात आल्याची माहिती शिवसेना सचिव तथा सहमुख्य संपर्क प्रमुख (मराठवाडा) डॉ. संजय लाखेपाटील यांनी दिली.
मागील महिन्यात ३ एप्रिल रोजी शिवसेना सचिव डॉ. संजय लाखेपाटील, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख तथा नवी मुंबईचे नगरसेवक अंकुश बाबा कदम, रघुनाथ चित्रे, प्राचार्य मोरे सर, करण गायकर, राहुल गावडे आणि शरद देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ संभाजी शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी माहुली संगम येथील समाधीस्थळाची दुरवस्था छायाचित्रे व व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा आणि मोगल बादशहा औरंगजेबाला दक्षिणेत रोखून धरणाऱ्या रणरागिणी ताराराणी तसेच दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवणारे थोरले शाहू महाराज यांच्या कार्याला साजेसे प्रेरणादायी स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांना स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत या भव्य स्मारकासाठी १३३ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. या निर्णयाबद्दल डॉ. संजय लाखेपाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पर्यटन मंत्री तथा सातारा पालकमंत्री शंभूराजे देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांचे आभार मानले. हे स्मारक केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून, मराठ्यांच्या पराक्रमाचा, स्वराज्याच्या संघर्षाचा आणि हिंदवी साम्राज्याच्या तेजस्वी इतिहासाचा प्रेरणादायी वारसा जतन करणारे केंद्र ठरेल, अशी भावना डॉ. लाखेपाटील यांनी व्यक्त केली.