जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून
अहिल्यानगर, प्रतिनिधी :- जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय शाळा १५ जून रोजी, नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत ‘पहिला दिवस शाळेचा, एक तास खेळाचा’ या संकल्पनेअंतर्गत करेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली
आंतरराष्ट्रीय खेळ दिनानिमित्त द ओपनट्री फाउंडेशन व स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘खेळ जपा, बालपण जपा’ या महाराष्ट्रातील पहिल्या जिल्हास्तरीय चर्चासत्रात ते बोलत होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजीत सुधीर तांबे यांनी शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे असावे, असे सांगितले
विद्यार्थीकेंद्रित, अनुभवाधारित व कौशल्याधारित शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता अधोरेखित करत त्यांनी हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आणि विशेषतः संगमनेर येथे लवकरात लवकर राबविण्याची इच्छा व्यक्त केली
संयुक्त राष्ट्रांच्या बालहक्क करारातील कलम ३१ नुसार खेळाला प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क म्हणून मान्यता देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील आनंददायी शिक्षणाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत अशी सखोल चर्चा अहिल्यानगर जिमखाना येथे झाली. उद्घाटनपर भाषणात द ओपनट्री फाउंडेशनच्या सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता चारी यांनी शिक्षण प्रक्रियेतून खेळ हरवल्यास मुलांच्या भविष्यावर होणाऱ्या परिणामांविषयी चिंता व्यक्त केलीस्नेहालयाचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी खेळ हा मुलांपर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग असून त्यातून मुलांना स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळते, असे नमूद केले. नुवामा ग्रुपच्या ईएसजी व सीएसआर प्रमुख रश्मी नागोरी यांनी खेळाच्या माध्यमातून मुलांचा आत्मविश्वास व चिकित्सक विचारक्षमता वाढत असल्याचे सांगितले. नांदेडच्या संस्कृती संवर्धन मंडळाच्या शिक्षण प्रमुख श्रद्धा रोहित देशमुख यांनी खेळामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमधील भावनिक अंतर कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदवले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन नोमोबोचे संस्थापक व द ओपनट्री फाउंडेशनचे विश्वस्त देवेंद्र नाईक यांनी केले
येत्या काळात द ओपनट्री फाउंडेशन जिल्हा प्रशासनासोबत काम करून आपला उपक्रम जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमधील शाळांपर्यंत विस्तार करणार आहे. शाळांना क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे आणि अहिल्यानगरला क्रीडा-एकात्मिक शिक्षणासाठी महाराष्ट्रातील आदर्श जिल्हा बनविणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या परिषदेस महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी जुबेर पठाण, महिला व बाल विकास समितीच्या उपाध्यक्षा वर्षा सानप, विस्तार अधिकारी पोपटराव धामणे यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. गेल्या २१ वर्षांपासून कार्यरत असलेल्या द ओपनट्री फाउंडेशन आणि अहिल्यानगरमधील स्नेहालय यांच्या २०१३ पासूनच्या सहकार्यामुळे राज्यातील १२ जिल्ह्यांमधील १० लाख मुले, १० हजार शिक्षक व ९०० शासकीय शाळांपर्यंत खेळाधारित शिक्षणाचा विचार पोहोचला आहे.