अत्याधुनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार दिशादर्शक- वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ ‘पल्स वैद्यकीय परिषद’ २७ व २८ मार्च रोजी
अत्याधुनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार दिशादर्शक- वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ ‘पल्स वैद्यकीय परिषद’ २७ व २८ मार्च रोजी
मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ दिशादर्शक ठरणार आहे. २७ व २८ मार्च २०२६ रोजी जिओ कन्व्हेशन सेंटर येथे या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वैद्यकीय व औषधी द्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी यांच्या उपस्थितीत परिषदेचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. देश तसेच विदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील सुमारे २,९०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेत डिजिटल हेल्थ, कृत्रिम बुद्धिमत्ता, वैद्यकीय शिक्षणातील सुधारणा, कौशल्य विकास, संशोधन व नवकल्पना, तसेच ग्रामीण व सार्वजनिक आरोग्य बळकटीकरण या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.
राज्याचा सर्वांगिण विकास आणि विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित करणे आवश्यक असून, यासाठी ही परिषद महत्वपूर्ण ठरणार आहे. या परिषदेमुळे आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, औषधनिर्मिती उद्योग, स्टार्टअप आणि वेलनेस पर्यटन या क्षेत्रांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. परिषदेत देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक, उद्योगपती आणि धोरणकर्ते सहभागी होणार असून त्यांच्या सहभागातून नवीन तंत्रज्ञान, आधुनिक उपचारपद्धती आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यावेळी ३० विविध कंपन्या आणि संस्थांसोबत करार करण्यात येणार आहे.
आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचा समन्वय साधून एकात्मिक आरोग्य व्यवस्था विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. फार्मसी क्षेत्रातील नवीन संशोधन, डॉक्टरांचे संशोधन पेपर आणि नवकल्पनांचे सादरीकरणही परिषदेत होणार आहे. या माध्यमातून राज्याच्या मेडिकल टूरिझम आणि वेलनेस पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. ही परिषद केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता ठोस निर्णय, गुंतवणूक करार आणि धोरणात्मक बदल घडवून आणणारे व्यासपीठ ठरेल. त्यामुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक आधुनिक, परिणामकारक आणि सर्वसमावेशक होऊन ग्रामीण भागातही दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.