
दिल्लीसमोर महाराष्ट्राचा सह्याद्री कधीच झुकणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे
मुंबई प्रतिनिधी : आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार असून, सत्तेत असताना कधीच सुडाचे राजकारण केलेले नाही. पवार कुटुंबीयांना असा संघर्ष नवीन नाही. दिल्ल्लीने महाराष्ट्रावर कितीही अन्याय केला तरी दिल्लीसमोर महाराष्ट्राचा सह्याद्री कधीच झुकणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
ठाण्यातील आई तुळजा भवानी मंदिरात आज सुप्रिया सुळे महाआरतीसाठी आल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडल्यानंतर सुळे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. मंदिरे उघडल्याने आघाडी सरकारचे आभार. नागरिकांनी नियम पाळून नवरात्रोत्सव साजरा करावा. वर्षातून नऊ दिवस एकदाच शांताबाई पवार आणि माझी आई उपवास करायच्या. तीच प्रथा माझ्या आईने सुरू ठेवली. त्यामुळे नवरात्रोत्सव माझी आईच असल्याचे सुळे म्हणाल्या.
महाआरतीमध्ये सुमारे १०८ महिलांनी सहभाग नोंदविला होता. या वेळी ‘संघर्ष’च्या महिला अध्यक्षा तथा समाजसेविका ऋता आव्हाड, राष्ट्रवादीचे गटनेते तथा प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक तथा प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष सुजाता घाग, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी आदी उपस्थित होते.”ज्यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडले आहेत ते केवळ दादाचे नातेवाईक नसून आमचेही नातेवाईक आहेत. आमचे सर्वांचे एकत्र कुटुंब आहे. दिल्लीकडून अशाप्रकारे सुडाचे राजकारण केले तरी दिल्लीसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही.”- सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस



