
मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र हाऊसफुल्ल; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी
ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सुविधांवर वारकरी समाधानी ….
पंढरपूर, प्रतिनिधी : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास व पंचायत राज विभागाने पुरवलेल्या सोयी-सुविधांमुळे वारकरी समाधानी झाले आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज धर्मपुरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाला भेट देऊन सुविधांची पाहणी केली व संस्थानचे विश्वस्त, सोहळा प्रमुख आणि वारकऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.
जमिनीवर बसून घेतला प्रसाद:
मंत्रीपदाचा कोणताही बडेजाव न ठेवता पालकमंत्री गोरे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर वारकऱ्यांसमवेत पायी चालत कारुंडे बंगला येथील माऊलींच्या विसाव्याच्या ठिकाणी जाऊन सोहळा प्रमुखांची भेट घेतली. सोहळा प्रमुखांसमवेत जमिनीवर मांडी घालून वारकऱ्यांसोबत प्रसाद घेतला व कार्यालयातही जमिनीवर बसून सोहळ्यातील सुविधांबाबत चर्चा केली.



