क्षयरोगाविषयी असलेले गैरसमज दूरकरण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी – अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर
सांगली, प्रतिनिधी : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील टार्गेट रूग्णांची 100 टक्के तपासणी करावी. मृत्यू दर कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. क्षयरूग्णांना पौष्टिक आहार देण्याच्या कार्यात सामाजिक संस्थांचा सहभाग वाढवावा. क्षयरोगाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी आज येथे दिल्या
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या टी. बी. फोरम आणि टी.बी.मुक्त भारत जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. यु. राचोतकर, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालय कडील डॉ पाटणकर, डॉ. भिंगारदिवे, राहुल डोंगरे जिल्हा युवा अधिकारी, NCC प्रतिनिधी, रोटरी क्लब प्रतिनिधी, टीबी चॅम्पियन, रुग्ण प्रतिनिधी,जिल्हा व शहर क्षयरोग कार्यलयकडील अधिकारी ,कर्मचारी, – यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर म्हणाले, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा निःक्षय होण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा करावा. प्रत्येकाने संवेदनशीलनेने सक्रिय कामकाज करावे. क्षयरोग्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे मानसिक समुपदेशन करावे. यशस्वी उपचारांद्वारे क्षयरोगमुक्त झालेल्या रूग्णांच्या यशकथा प्रसारित कराव्यात.
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. यु. राचोतकर यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी क्षयरूग्णांसाठी स्वतंत्र रूग्णालय, तसेच उपचारासाठी साधनसामग्री वाढवण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला.0000