माणूस मारून विचार संपत नाही!’ दाभोलकरांच्या स्मरणार्थ घाटकोपरमध्ये निर्भय मॉर्निंग वॉक-संदेश देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
मुंबई, प्रतिनिधी : गोळ्या झाडून माणूस मारता येतो; मात्र त्याचे विचार मारता येत नाहीत, हा निर्भीड संदेश देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुंबई जिल्ह्याच्या वतीने घाटकोपर येथील भटवाडी परिसरात ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढण्यात आला.
२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मॉर्निंग वॉकदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येला १३ वर्षे पूर्ण होत असतानाही या प्रकरणामागील संपूर्ण सूत्रधारांपर्यंत तपास पोहोचलेला नाही, अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. ‘माणूस मारून विचार संपत नाही!’ हा निर्धार व्यक्त करत अंधश्रद्धा, कर्मकांड आणि विवेकविरोधी प्रवृत्तींविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
भटवाडी येथील गणेश मंदिरापासून वागडवाला जॉगिंग ट्रॅकमार्गे एलबीएस रोड, घाटकोपरपर्यंत हा निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. मार्गावर डॉ. दाभोलकरांच्या विचारांचा जागर करणारे पोस्टर प्रदर्शन करण्यात आले.
‘फुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर’, ‘माणूस मारून विचार संपत नाही’, ‘विवेकाचा आवाज बुलंद करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याच्या निर्णयाचाही कार्यकर्त्यांनी निषेध केला. हत्या प्रकरणातील न्यायप्रक्रिया अधिक प्रभावीपणे पुढे जावी आणि हत्येमागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांना कायद्याच्या कक्षेत आणावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या निर्भय मॉर्निंग वॉकमध्ये अंनिसचे राज्य प्रधान सचिव विजय परब, नंदकिशोर तळाशीलकर, मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष यश सूर्यवंशी, विविध उपक्रम विभागाचे कार्यवाह संदेश बालगुडे, सोशल मीडिया विभागाचे कार्यवाह प्रवीण जावळे, घाटकोपर शाखेचे प्रधान सचिव प्रफुल्ल रणदिवे, यांच्यासह मुंबई अंनिसचे कार्यकर्ते व समविचारी साथी टीम व्हिजनचे संदेश भिंगार्डे, नवनिर्मिती संस्थेचे नंदकुमार जाधव आणि मासचे दिनेश राणे सहभागी झाले होते .