ठाणे जिल्ह्यात शहरी भागात ८३२ “आपले सरकार सेवा केंद्र सुरू करणेबाबत जाहिरात प्रसिद्ध इच्छुकांनी दि. १ ते ३० सप्टेंबर दरम्यान अर्ज करावेत
ठाणे, प्रतिनिधी: ठाणे जिल्ह्यातील शहरी भागातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात रिक्त असलेल्या एकूण ८३२ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी शासनाच्या विविध निर्देश व मार्गदर्शक तत्त्वांच्या अधिन राहून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या केंद्रांच्या लिलावासाठी किंवा वाटपासाठी दि. ०१ सप्टेंबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
सामान्य प्रशासन विभाग व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या शासन निर्णयानुसार, अर्जदारांनी दिलेल्या https://forms.gle/fv7WjWuEUT7eN14E8 या ऑनलाईन लिंकवर विचारलेली सर्व माहिती मराठी भाषेत अचूक भरणे बंधनकारक आहे. अर्ज सादर झाल्यानंतर अर्जदाराच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर अर्जीची प्रत प्राप्त होईल. प्राप्त झालेली प्रिंट काढून त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रे स्वतः साक्षांकित (स्वयं-साक्षांकित) करून, संबंधित तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे दि. ०१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी कार्यालयीन वेळेत (सकाळी ९:४५ ते संध्याकाळी ६:१५ वा.) प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे.
क्षेत्रनिहाय रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:ठाणे : २४५, नवी मुंबई : ९२, मिरा-भाईंदर : १२५, भिवंडी-निजामपूर : १०५, कल्याण-डोंबिवली : १८८, उल्हासनगर : ५१, अंबरनाथ : १२, बदलापूर : १४, शहापूर : निरंक, मुरबाड : निरंक, एकूण रिक्त केंद्र: ८३२
या जाहिरातीसंदर्भातील सविस्तर अटी, शर्ती व मार्गदर्शक तत्त्वांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://thane.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, इच्छुक नागरिकांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.