
अमली पदार्थांपासून तरुणाईला दूर ठेवा, सतर्कपणे काम करा”गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची पोलीस यंत्रणेला सूचना
नागपूर प्रतिनिधी : अमली पदार्थाच्या विळख्यात सापडून तरुणाई उद्ध्वस्त होऊ शकते. हे ध्यानात घेऊन पोलिसांनी आता नक्षलवाद आणि दहशतवादाइतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीत लक्ष द्यावे, अशी सूचना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस दलाला केली.
येथील पोलीस निवासस्थानाचे नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत आदी उपस्थित होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे उद्घाटनही त्यांनी केले.
सध्या अमली पदार्थाचा विषय सर्वत्र चर्चेत आहे. त्याला स्पर्श करताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी अमली पदार्थ आणि दुष्परिणामाचे सांकेतिक विश्लेषण केले. दहशतवाद आणि नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी पोलीस ज्या सतर्कतेने आणि आक्रमकपणे काम करतात तशाच प्रकारे आता अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना काम करावे लागेल. त्यासाठी शाळा महाविद्यालयाच्या अवती-भवतीही नजर रोखावी लागेल, असे ते म्हणाले.
पोलिसांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. पोलिसांचे संख्याबळ वाढवण्यासाठी १२ हजार पोलिसांच्या भरतीचे उद्दीष्ट सरकार समोर असल्याचे त्यांनी सांगितले.



