
धार्मिक नेता बाबा कालिचरण ,याविरोधात राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नौपाडा पोलिसांत विरोधात गुन्हा दाखल केला.
ठाणे : प्रतिनिधी धार्मिक नेता बाबा कालिचरण याने रायपूर येथील धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात गरळ ओकली होती. याविरोधात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नौपाडा पोलिसांत कालिचरणविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर “आता फॅसिझमविरोधात मैदानात उतरुन लढावचं लागेल,” असं ट्वीटही आव्हाड यांनी केलं.
आव्हाड म्हणाले, “फॅसिझमविरुद्ध मैदानात उतरून लढावंच लागेल. गोडसेच्या पाठिराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. मी स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक न ठेवता बाबा कालीचरणविरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवायला चाललो आहे. ही विचारांची लढाई आहे”
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांना घेऊन राष्ट्रवादीचे नेते अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. रायपूर येथे बाबा कालीचरण यानं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात जे अपशब्द वापरले त्याविरोधात आम्ही गुन्हा नोंदवला आहे. त्याचबरोबर गांधीहत्येचं समर्थन करत त्यानं नथुराम गोडसेबाबत गौरवौग्दार काढले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनं पुन्हा या वक्तव्याचं समर्थन केलं. तसेच माझ्यामध्ये जे येतील त्यांना मी कापून टाकेन अशा प्रकारचं वक्तव्य केलं. याआधीही झालेल्या भाषणांमध्येही त्यानं द्वेष पसरेल अशी भाषा वापरली, यासाठी त्याच्यावरती मी स्वतः गुन्हा नोंदवलेला आहे. कलम २९४, कलम २९५ अ, २९८, ५०५-२, ५०६-२, आयपीसी ३४ अशा सहा कलमांतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पुढची कारवाई पोलीस करतील” अशी माहिती आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.



