
एका चुकीच्या शिक्षकांमुळे पिढी बरबाद होते – राज्यमंत्री बच्चू कडू..
मुंबई प्रतिनिधीगुणवत्ता नसलेला एक शिक्षक चुकला तर लाखो विद्यार्थी आणि त्यांची पिढीही पुढे आयुष्यात चुकते. त्यामुळे या शिक्षकांच्या गुणवत्तेवर आणि गोरगरीब मुलांच्या दर्जेदार शिक्षणावर कधीही सभागृहात चर्चा होत नाही, ती चर्चा कधी तरी सभागृहात चर्चा केली जावी असे सांगत शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी शिक्षक आमदारांचे आज कान टोचले.शिक्षक आमदार सुधीर तांबे यांनी राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची हजारो पदे रिक्त असल्याने गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, त्यामुळे मराठी शाळा बंद होत असल्याचा मुद्दा आज विधान परिषदेत अर्धातास चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्यावर कडू यांनी शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करीत राज्यातील प्रत्येक शाळेत गुणवान शिक्षक कसा जाईल, यासाठी सर्वांनी आग्रह धरला पाहिजे आणि प्रत्येक शिक्षकांची गुणवत्ताही पाहिली पाहिजे, असे ठणकावून सांगितले.
राज्यातील सरकारी, अनुदानित आदी शाळांतील जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवणार नसतील आणि केवळ लाभ घेत असतील तर त्यांच्या बाजूनं लोकप्रतिनिधीने उभा राहणं म्हणजे एक प्रकारचा करंटेपणा आहे. त्यामुळे शिक्षक काम करत नसतील तर आपण सर्वांनी हेही तपासून पाहिले पाहिजे. मात्र या विषयावर सभागृहात कधी चर्चा होत नाही. शिक्षकांना सरकार वेतन आणि सर्वकाही देतो. परंतु त्या बदल्यात जर हे शिक्षक गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण देत नसतील आणि चुकत असतील तर त्यांच्यामुळे लाखो विद्यार्थी चुकतात आणि पुढची पिढीसुद्धा चुकते असे सांगत कडू यांनी शिक्षक शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी सदस्यांनी सभागृहात चर्चा करावी असे आवाहन केले.गोरगरिबांच्या शाळेचा आणि त्यांच्या दर्जेदार शिक्षणाचा विषय सभागृहात राहिलेला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. शिक्षक आमदार केवळ पवित्र पोर्टल रद्द करून खाजगी संस्थांना शिक्षक भरती करण्याची मुभा मागत आहेत, परंतु या पोर्टलमध्ये असलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आग्रह धरत नाहीत असा आरोपही त्यांनी केला.



