
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेला 15 हजार लोकांची परवानगी, आज तातडीची बैठक
औरंगाबाद प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळताच जोरदार तयारी सुरु झाली आहे. स्टेजचं काम संपत आले आहे. खुर्च्याही मैदानावर दाखल झाल्यायत. गुरुवारी रात्री उशिरा सभेसाठी परवानगी मिळाली. सभेला15हजार लोकांची परवानगी मिळालीय. पण जास्त लोक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियोजनाबाबत औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी आज दुपारी मनसे पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले आहे.
राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील 1 मेच्या सभेला सशर्त परवानगी मिळाल्यानंतर मनसेनं जोरदार रणनीती आखली आहे. 1 मेला औरंगाबादला सभा, 2 मे रोजी महाआरती आणि 5 जूनला थेट अयोध्या दौऱ्यावर राज ठाकरे जाणार आहेत. तर औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेपूर्वी ते आजच पुण्यात रवाना होणार आहेत. तिथे औरंगाबादची सभा, महाआरती आणि अयोध्या दौऱ्याबाबत मनसे नेत्यांसोबत राज ठाकरे चर्चा करणार आहेत.
त्यानंतर उद्या राज ठाकरे औरंगाबादला रवाना होतील. राज ठाकरे यांनी सरकारला भोंग्यांवरून अल्टिमेटम दिलाय. 3 तारखेला अल्टिमेटम संपत असून, त्याच दिवशी मनसेने महाआरतीचे आयोजन केले आहे. त्यामुळे पोलिसांनीही राज्यभरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवली असून, सुरक्षेच्या दृष्टीनेही पुढील तीन ते चार दिवस खूप महत्त्वाचे असणार आहे.



