
वसई परिसरात झालेल्या भूस्खलनात दोन जणांचा मृत्यू; CM Eknath Shinde यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना 6 लाखाची मदत जाहीर…
मुंबई प्रतिनिधी पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात दरड कोसळल्याची घटना आज घडली. यामध्ये अनेक लोक अडकले होते, तसेच अनेक घरांचे नुकसानही झाले आहे. या भूस्खलनात एक व्यक्ती आणि त्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. अन्य दोघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्हाधिकारी तसेच वसई विरार महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत.
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून आणि प्रत्येकी 2 लाख रुपये महानगरपालिकेकडील निधीतून अशी 6 लाख मदत केली जाईल. याशिवाय जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत



