
सातारा येथील 14 कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाची धडक कारवाई; परवाने कायमस्वरूपी केले रद्द…
सातारा प्रतिनिधी
सातारा : यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अप्रमाणित बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करणाऱ्या १४ कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान या कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
कारवाई झालेल्यांमध्ये ३ बियाणे विक्रेते, ९ खत विक्रेते व २ कीटकनाशक विक्रेत्यांचा समावेश असून, त्यापैकी २ खत विक्रेते व १ कीटकनाशक विक्रेत्याचे परवाने कायमस्वरूपी रद्द केल्याची माहिती कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली.
जिल्ह्यात सद्यःस्थितीत रासायनिक खतांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे. त्यामध्ये युरिया-१६ हजार ७६४ मेट्रिक टन, डीएपी १० हजार २८७ मेट्रिक टन, म्युरेट ऑफ पोटॅश ९२६ मेट्रिक टन, सुपर फॉस्फेट ९ हजार ३७५ मेट्रिक टन तसेच इतर संयुक्त खते २५ हजार ९२७ मेट्रिक टन या प्रमाणात उपलब्ध आहेत.
ज्वारी – ६८५ क्विंटल, बाजरी १ हजार ५९५ क्विंटल, भात १० हजार ७४९ क्विंटल, सोयाबीन १४ हजार ९६ क्विंटल, घेवडा २ हजार १७९ क्विंटल, मक्याचे ६ हजार ३४७ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. ऑफलाइन विक्री करणाऱ्या केंद्रांवर कारवाईचे संकेतही श्री. माईनकर यांनी पत्रकात दिले आहेत. शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या अनुषंगाने तक्रारी नोंदविण्यासाठी मोबाईल क्रमांक ७४९८९२१२८४ येथे संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी विभागातर्फे केले आहे.
पेरणीची घाई करू नका…पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा (४ ते ५ इंच खोल) किंवा ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.



