
मराठवाड्याच्या पाण्यासाठी सतीश घाटगे आक्रमक : पश्चिम महाराष्ट्रात जाणारा ऊस रोखला–नाशिक, नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची कोंडी..
राज्य प्रतिनिधी जालना /अंबड: मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीच्यावतीने सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळासमोरील जालना रोडवर चार तास रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात सतीश घाटगे यांनी शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन सक्रीय सहभाग नोंदवला. आंदोलनानंतरही ठोस निर्णय न झाल्याने सायंकाळी सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात जाणारा ऊस रोखला. आंदोलकांनी अंबड तालुक्यातील शेवगाव- पैठण रोडवरील सोनवाडी फाट्यावर टायर जाळून उसाचे वाहने रोखली होती. या आंदोलनामुळे नाशिक, नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची कोंडी झाली.
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या आडमुठ धोरणामुळे दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाड्याचे पाणी अडवण्यात आले आहे. १५ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या जायकवाडी धरणातील पाण्याच्या स्थितीनुसार आणि समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.परंतु,त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी पाणी सोडण्यास विरोध दर्शवणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याविरोधात सतीश घाटगे यांनी समृद्धी साखर कारखान्याच्या माध्यमातून हस्तक्षेप याचिका दाखला केली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सतीश घाटगे यांनी जनआंदोलनाची सुरुवात ११ नोव्हेंबर रोजी धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवून केली. त्यानंतर मराठवाडा पाणी परिषद आणि मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेऊन गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा ऊस रोखण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही पाणी सोडण्यास टाळाटाळ होत असल्याने सोमवारी रात्री शेवगाव- पैठण रोडवरील सोनवाडी फाट्यावर पश्चिम महाराष्ट्रात ऊस घेऊन जाणारे वाहने अडवले. यानंतरही सरकारने पाणी सोडल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सतीश घाटगे यांनी दिला आहे.
———————-
तर उसतोड कामगार कोयता खाली ठेवणार – सतीश घाटगे
मराठवाड्याचे हक्काचे पाणी घेतल्याशीवाय आम्ही मागे हटनार नाही. मराठवाड्यातील शेतकरी आता रस्त्यावर उतरत आहेत. नाशिक, नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस रोखून शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. त्यानंतरही त्यांनी आपली भूमिका न बदलल्यास ऊसतोड कामगारांना कोयता बंदची हाक देऊन पुन्हा त्यांची कोंडी करणार आहे.
सतीश घाटगे, चेअरमन, समृद्धी साखर कारखाना



