
१०वी, १२ वी कॉपीमुक्त परीक्षा; मनाई आदेश, भरारी पथकांची नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता १० व व १२ वी च्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च याकालावधीत होणार आहेत. परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडाव्या यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी मनाई आदेश जारी केले असून भरारी पथकांच्या नियुक्तीचे आदेशही दिले आहेत.
परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात व त्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परीक्षा केंद्र परिसराच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्र व त्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी वगळून अन्य कुणाही व्यक्तिस प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र परिसरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. १०० मीटर परिसरात झेरॉक्स दुकाने सुरु ठेवण्यास, सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बुथ, आयएसडी बुथ, फॅक्स केंद्र, मोबाईल, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, रेडीओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप इ. जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश दि.११ फेब्रुवारी ते दि.१८ मार्च या कालावधीत अंमलात राहतील असे कळविण्यात आले आहे.
भरारी पथके नियुक्तया परीक्षा कालावधीत जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त वर्ग १ अधिकाऱ्यांची भरारी पथके नियुक्त करण्याचे आदेशही अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात तहसिलदारांच्या नेतृत्वात भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहेत. एका पथका किमान चार सदस्य असतील व एक सदस्य महिला असेल. त्याच प्रमाणे प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक बैठे पथकही नियुक्त असेल व त्यातही एक सदस्य महिला असेल. परीक्षा सुरळीत होण्याच्या दृष्टीने या पथकांनी कारवाई करावी,असे निर्देश देण्यात आले आहेत.
०००००



