
आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरवात*एसएमएस आलेल्या पालकांनी कागदपत्रे पडताळणी करण्याचे आवाहन..
बुलडाणा, : बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार मंगळवार, दि. 23 जुलैपासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे. एसएमएस येणाऱ्या पालकांनी दि. 31 जुलैपर्यंत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे कागदपत्रे पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. सन 2024-25 या वर्षातील प्रक्रिया राबविण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाची सुधारीत अधिसूचने उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती असल्यामुळे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेची विद्यार्थी निवडयादी व प्रतिक्षायादी जाहीर करण्यात आली नव्हती.
आता उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानुसार सन २०२४-२५ वर्षातील आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत दि. ७ जून २०२४ रोजी राज्यस्तरावरुन काढण्यात आली आहे. निवडपात्र विद्यार्थ्यांची यादो व प्रतिक्षा यादी दि. २० जुलै २०२४ रोजी student.maharashtra.gov.in/adm_portal संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार, दि. २२ जुलै २०२४ पासून एसएमएस जाण्यास सुरुवात झाली आहे. प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त झालेल्या पालकांनी दि. २३ ते ३१ जुलै २०२४ पर्यंत आपल्या जिल्ह्यातील संबंधित तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कागदपत्र पडताळणी समितीकडे कागदपत्रे पडताळणी करून बालकांचा प्रवेश विहीत मुदतीत निश्चित करावा. विहीत मुदतीत प्रवेश केला नसल्यास त्याची जबाबदारी संबंधिताची राहणार आहे.
जिल्ह्यातील पालक, मुख्याध्यापकांनी सन २०२४- २५ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील पालकांनी बालकांचे शाळेत प्रवेश करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



