वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन,शेतकऱ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक- ॲड. निलेश हेलोंडे पाटील
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक अशा सर्वांगिण प्रगतीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक आहे. पशुपालकांना जनावरांसाठी चारा उपलब्धतेसाही जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभाग यांनी मिळून नियोजन करावे,असे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांनी आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर ,उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, संगीता राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी ,उपजिल्हाधिकारी (रोहयो) उमाकांत पारधी, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, पशुसंवर्धन, सहकार व पणन आदिवासी विकास विभाग, जिल्हाशल्यशिक्षक यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
सहकार आणि पणन विभागाने सावकारांकडे अडकलेली शेतकऱ्यांची जिल्ह्यामध्ये एकूण ११६ हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळवून दिली. सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता करणे, आणि आत्महत्येपासून शेतकऱ्यांना परावृत्त करणे यासाठी हे अभियान महत्वपूर्ण असल्याचे यावेळी हेलोंडे पाटील यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेमध्ये जिल्हा सलग तीन वर्ष देशात प्रथम क्रमांकावर असून प्रक्रिया उद्योगांमध्ये जिल्ह्यात सोलार ड्राइंग सारखे उद्योग उभारले जात आहे
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग व्यवसाय यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहे. आगामी कालावधीमध्ये सामाजिक संस्थांचा सहभाग आणि उद्योगाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विविध उपक्रम राबवून आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेती विकासासाठी, शिक्षण, आरोग्य विकासासाठी काम करण्यात येणार आहे,असे सांगितले.
पशुधनाला मुबलक चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकऱ्यांना चारापिक बियाणे वाटप करण्यात आले असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत सांगण्यात आले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी रासायनिक खताऐवजी सेंद्रिय शेती आणि सीड बँकेच्या माध्यमातून बियाणे उपलब्ध करण्याची व्यवस्था विकसित करण्यात यावी, यासाठी आत्मा प्रकल्प अंतर्गत विविध प्रशिक्षण शिबीरे आयोजित करून शेतकऱ्यांना बांधावर सेंद्रिय खताच्या निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात यावे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत क्रीडांगणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षेचे पुस्तक उपलब्ध करून देण्याबाबत शिक्षण विभागाला सूचना केल्या.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या विकासासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री किंवा जोड व्यवसाय प्रशिक्षण, व्यवसाय, कृषी आधारित प्रक्रिया उद्योग यावर भर द्यावा. जिल्हा परिषद आणि कृषी विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायती मध्ये पिक विमा संदर्भात संबंधित प्रतिनिधीचे फोन नंबर आणि नाव याची माहिती प्रदर्शित करावी, तसेच कौशल्य विकास अंतर्गत ग्रामीण भागात विविध योजनांची माहिती देणारे पोस्टर्स ग्रामपंचायत आणि गाव गाव पातळीवर प्रदर्शित करून माहिती पुस्तिकाही वितरित करावी.जिल्ह्यातील सर्व विभागांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करावे,असे निर्देश ॲड. हेलोंडे पाटील यांनी दिले.