मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा देणं म्हणजे चंद्राला ‘ तु किती सुंदर दिसतो ’ म्हणत आरसा दाखवण्या सारखे आहे.
राज्य प्रतिनिधी अकराव्या शतकात चक्रधर स्वामींचे लिलाचरित्र लिहिले गेले आणि त्यानंतर बाराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हे प्रतिभेचे सुंदर शब्द लेणं साकारल अनेक रस, उपमा यांनी ओतप्रोत अशी ही ज्ञानेश्वरी दिपस्तंभासारखी प्रलल्भ मराठी भाषा घेऊन उभी राहिली. ज्याअर्थी हे ग्रंथ मराठीत निर्माण झाले त्याअर्थी तेव्हा दोन तीन शतकं तरी मराठी बोललीच जात होती. त्यामुळेच “ अमृताते ही पैजा जिंके ” एवढा आत्मविश्वास ज्ञानेश्वरांच्या लिखाणात होता. या दिपस्तभांच्या प्रकाशात अनेक संतांनी नामदेव, मुक्ताई, जनाबाई, एकनाथ ते तुकाराम यांच्या पर्यंत अनेकांनी आपल्या भावना विचार अभंग ओव्यांमधुन अविष्कृत केले.
इंग्रजांच्या काळातही जे त्यांच्या भाषेपुढे मराठी ताठ बाण्याने उभी होती. विष्णु शास्त्री चिपळुणकर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान प्रबोधन सामाजिक व शैक्षणिक प्रबोधनासाठी मराठी मधुनच संवाद साधला. एक वेगळा बाज राखून तत्कालीन मराठी आब राखून होती. पल्लेदार वाक्य तर कोठे बहुजनांना कळल अशी सोपी मराठी त्या काळात आपल्याला वाचायला मिळते. एवढ्या मोठ्या प्रवासात मराठीने अनेक परभाषीय शब्द सामावून घेतले होते. शिवकालीन मराठीत आपल्याला ते पाहायला मिळतात.
एवढ्या मोठ्या कालखंडाचा इतिहास असलेली मराठी आधीच अभिजात होती, संपन्न होती. राजयातल्या प्रत्येक बोलीभाषेचं सौंदर्य सांभाळून त्यांना सामावून घेत आजपर्यंतच्या मराठीपर्यंत वाटचाल करत आली. तिला अभिजात दर्जा द्यावा यासाठी म्हणूनच संघर्ष केला आणि यशही मिळाले.
आधुनिक मराठीमध्ये अनेक कवी, लेखक, नाटककार नावारुपाला आले. यात श्री. वि. स. खांडेकर, विं,दा. करंदीकर, वि.वा. शिरवाडकर आणि भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत.हा सगळा विचार करता अभिजात दर्जा थोडा उशिराच मिळाला असे म्हणावे लागेल. अभिजात भाषेचा सर्व निकषांवर मराठी उतरते.
आता अभिजात दर्जा मिळाल्यावर काही योजना कार्यान्वित होतील. ज्यात अनुदान, विद्यार्थ्यांना मराठी शिक्षणासाठी मदत, राष्ट्रीय पुरस्कार, ग्रंथांचे अनुदान या योजना तर असतीलच पण महत्त्वाचे 450 विद्यापीठात मराठी भाषा शिकवली जाईल. मराठीचा भौगोलिक आवाका जो कमी आहे तो वाढेल. मराठी बोलणारे समजणारे वाढतील.
केंद्र सरकारकडून या योजना आल्या की झपाट्यानं विकास होईल. मग मराठी शुध्द मराठी कशी वापरावी आपल्या नवीन पिढीला ती कशी आवडेल हा विचार आपण जबाबदारीनं करायचा आहे. मराठीतले वाचन वाढवण्यास त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.
हिंदी , इंग्रजीतून अनेक अनुवाद मराठीमध्ये केले जातात. पण मराठीतील किती साहित्याचा अनुवाद हिंदी, इंग्रजीत होतो हे प्रमाण पहायला हवे. तो समतोल साधायला हवा तरच मराठी अनेक प्रांतीय भाषांमध्ये सुस्थिर होईल.
सरकारी भाषेतही रुळलेल्या इंग्रजीचे मराठी प्रतिशब्द सुलभ हवे. निरक्षर लोकांनाही कळतील असे हवे.तरच “ अमृताते ही पैजा जिंके ” हा ज्ञानेश्वरांचा अभिमान सार्थ ठरेल