डॉ गोविंदराज यांनी केला क्षेत्रीय पाहणी दौरा, शेतकरी, क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी साधला संवाद..
रायगड प्रतिनिधी– केंद्र व राज्य शासनामार्फत सर्वसामान्य नागरीकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात. तसेच जिल्हा प्रशासन देखील जिल्ह्याच्या विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असते. जिल्ह्यात या उपक्रमांची सूरु असलेली अंमलबजावणी, याचा लाभार्थ्यांना होणारा फायदा, त्यामुळे झालेला बदल एकूणच या योजनांची फलश्रुती याची प्रधान सचिव नगरविकास (2) तथा रायगड जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. के. एच गोविंदराज यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
पालक सचिव डॉ.के. एच. गोविंदराज यांनी आज रायगड जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. या भेटीपूर्वी त्यांनी क्षेत्रीय पाहणी दौरा केला. या दौ-यात त्यांनी जिल्हा परिषद शाळा, पांढरा कांदा उत्पादक शेतकरी, कांदा बियाणे निर्मिती उपक्रम, सामाजिक वनीकरण बांबू रोप वाटिका येथे भेट देऊन पाहणी केली. संबंधितांशी संवाद साधुन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड, पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे, उपसचिव सुशिला पवार, कक्ष अधिकारी अर्जुन लांडगे यांसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
बांबू रोपवाटीकेची पाहणी,महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार बांबू क्षेत्र व उत्पादनात वाढ करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांनी विशेष बांबू रोप निर्मिती मोहीम घेतली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत बांबू रोपांची निर्मिती करण्याचा नाविण्यपूर्ण प्रयोगाची पाहणी सामाजिक वनीकरणच्या रोप वाटीकेस भेट देऊन केली. रायगड जिल्ह्यात वनविभाग रोहा यांच्या ५ रोपवाटिका, वनविभाग अलिबाग यांच्या १५ रोपवाटिका, सामाजिक वनीकरण विभागाच्या १३ रोपवाटिका आणि कृषी विभागाच्या ७ रोपवाटिका अशा एकूण ४० रोपवाटिकांमध्ये २८ लक्ष बांबू रोपं लागवडीचे काम सुरु करण्यात आले आहे.राज्यात बांबू रोप वाटिका तयार करणारा रायगड जिल्हा एकमेव जिल्हा आहे. निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करून बांबू आधारीत उद्योगास चालना द्यावी असे निर्देश त्यांनी संबंधितास दिल्या.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर
रायगड जिल्ह्यातील अलिबागचा पांढरा कांदा चवीला गोड आणि औषधी गुणांसाठी ओळखला जातो. या कांद्याची चव आणि गुणधर्म जगभरात प्रसिद्ध आहेत. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय भौगोलिक मानांकन (Geographical Indication) मिळाले आहे. कार्लेखिंड परिसरातील सांगावं येथील कांदा उत्पादक शेतकरी सतीश पाटील यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. कांदा बीज निर्मिती, कांदा लागवड, येणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा केली. या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनातून लाभ देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य देण्यात येईल असेही श्री गोविंदराज यांनी सांगितले.
वरसोली समुद्र किनारा येथे भेट देऊन समुद्र किनारा स्वच्छतेसाठी येणाऱ्या बीच क्लीनिंग मशीन ची पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छ व सुंदर ठेवावेत अशा सूचना यावेळी दिल्या.
जिल्हा परिषद रायगड येथे भेट देऊन नूतन कार्यालयाची पाहणी आणि x रे मशीनची पाहणी केली. शेष फंडातून दिव्यांग बांधवांना दिलेल्या मोबाईल इ शॉप ला(फिरत्या वाहनावरील दुकान) भेट देऊन संवाद साधला.