प्रशासकीय कामकाजातून मराठी भाषा-संवर्धनाचे काम करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेचा प्रशासकीय कामकाजात पूर्ण वापर करून मराठी भाषा संवर्धनाचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. नागेश अंकुश यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, उमाकांत पारधी,डॉ.सुचिता शिंदे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
शासकीय कामकाज करत असताना मराठी भाषेचा वापर आणि उपयोग योग्य प्रकारे करून व्याकरण ,शुद्धलेखन, प्रमाणभाषा, लोकांना समजेल अशा प्रकारचा पत्र व्यवहार प्रशासकीय कामकाजात करण्यात बाबतच्या सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कार्यक्रमात दिल्या.
डॉ. नागेश अंकुश यांनी प्रशासकीय कामकाजातील मराठी भाषा, ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, प्रमाण लेखन, लेखन विषयक नियम, शुद्धलेखन व विविध शब्दाचा, शब्दकोशाचा वापर शासकीय कामकाज करत असताना करावा. प्रमाणभाषा म्हणून कोणकोणत्या नियमाचा अवलंब करणे आवश्यक आहे याविषयीचे मार्गदर्शन केले.
शब्दाची योग्य पद्धतीने मांडणी , शब्द आणि वाक्याचा होणारा अर्थबोध हा प्रमाण भाषेमध्ये असेल तर शासकीय कामकाज सुलभ होते ,याचे महत्त्व विशद करत असताना विविध उदाहरणाचे दाखले त्यांनी दिले.विविध शब्दांचा वापर वाक्यामध्ये करत असताना अनुस्वार, उकार ,वेलांटी , ऱ्हस्व, दीर्घ, शब्द, अव्यये, व्याकरण, संस्कृतमधून आलेले शब्द आणि तद्भव शब्दांविषयीचाही ऊहापोह या मार्गदर्शनपर व्याख्यांमध्ये उदाहरणासह सांगितला