उन्हाळी भुईमुगावर बुरशीचा धोका; शेतकऱ्यांनो आधीच घ्या काळजी!कृषी विभागाचे आवाहन
बुलडाणा, प्रतिनिधी: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी झाली असून, काही ठिकाणी पीक बहरत आहे. मात्र, हवामानातील बदल, जमिनीत जास्त ओलावा आणि तापमानातील चढ-उतार यामुळे भुईमुगावर बुरशीजन्य रोगांचा संभाव्य धोका वाढला आहे. त्यामुळे पांढरी बुरशी, मूळकूज आणि खोडकूज होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
बुरशीजन्य रोगांची लक्षणे:सुरुवातीला झाडांची पाने फिकट पिवळी पडू लागतात. त्यानंतर झाड हळूहळू सुकू लागते आणि उत्पादनावर परिणाम होतो. जमिनीत जास्त ओलावा राहिल्यास मूळ आणि खोड कुजण्याचा धोका वाढतो.बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय:
बीज प्रक्रिया: रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना करतांना ट्रायकोडर्मा व्हिरीडी (4 ग्रॅम/प्रति किलो बियाणे), कार्बोझीन 37.5% + थायरम 37.5% डब्ल्यु पी किंवा कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% पी (3 ग्रॅम/प्रति किलो बियाणे) या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.मातीची योग्य निगा: पेरणीपूर्वी रायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धन प्रत्येकी 250 ग्रॅम प्रमाणात 10-15 किलो बियाण्यास लावावे.
जमिनीची योग्य निगा ठेवा : पेरणी करतांना चांगला निचरा होईल याची खात्री करा. गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास मूळकूज आणि खोडकूज वाढू शकते. त्यामुळे जास्त पाणी टाळा.
पिकाचे नियमित निरीक्षण:-झाडांची पाने पिवळी पडतात का, खोडाजवळ पांढरी बुरशी दिसते का याकडे लक्ष द्या. झाडांची वाढ कमी होत असल्यास त्वरित कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. भुईमुगावर सध्या बुरशीजन्य रोग दिसत नसले तरी हवामान बदलांचा पीकावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पीक सुरक्षित राहण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.