एल्डर लाईन – 14567 ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन…
राज्य प्रतिनिधी-गेल्या काही दशकांमध्ये वृद्धांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ नोंदवली गेली आहे. सध्या, देशामध्ये सुमारे 15 कोटी लोकसंख्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे, ही देशातील एकूण लोकसंख्ये पैकी 9 % पेक्षा जास्त आहे. विविध संशोधन, कागदपत्रांनुसार, ही संख्या 2050 पर्यंत साधारण 35 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. भारतातील ज्येष्ठ नागरिकांची सहानुभूतीपूर्वक सेवा करून सुखी आणि निरोगी जीवन वृद्धींगत करण्यासाठी, विविध सरकारी विभाग, सामाजिक संस्था, स्वयंसेवक, अशा अनेक वचनबद्ध भागीदारांच्या सहभागातून आवश्यक ती माहिती आणि सहकार्य करून, भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन; एल्डरलाईन- 14567, सर्व राज्यांत व केंद्र शासित प्रदेशात सुरु करण्यात आली आहे.
सदर हेल्पलाईन राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (NISD), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये चालविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात एल्डर लाईन 14567 ही सेवा ऑगस्ट 2021 पासून राबवली जात आहे. या मध्ये कनेक्ट सेंटर व फिल्ड टीम, विविध शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, विविध ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध स्वयंसेवी संस्था, कायदेविषयक सल्लागार, समुपदेशक, स्वयंसेवक आदींच्या सहभागातून व मदतीने कार्यरत आहे. आज अखेर, राज्यभरातून जेष्ठ नागरिकांसाठी चार लाखाहून अधिक कॉल्स आले आहेत. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष प्रकारे मदत हेल्पलाइन ने केली आहे. तसेच तीस हजार हून अधिक प्रकरणे क्षेत्रीय पातळीवर यशस्वीरित्या हाताळली आहेत .
हेल्पलाईनशी संबंधित अत्यंत महत्त्वाची माहिती :एल्डर लाईन साठी 14567 हा क्रमांक टोल-फ्री आहे. एल्डर लाईन चे कार्य आठवड्याचे सर्व दिवस (म्हणजेच रविवार ते शनिवार) सकाळी 8.00 ते संध्याकाळी 8.00 चालते. संपूर्ण वर्षातील 362 दिवस सुरू असते (फक्त 26 जानेवारी, 15 ऑगस्ट व 2 ऑक्टोबर रोजी सुट्टी असते)
एल्डर लाईन द्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा:•माहिती देणे : आरोग्य विषयक जागरूकता, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण, सांस्कृतिक, कला, ज्येष्ठां संबंधी अनुकूल उत्पादने, आणि मनोरंजनाशी संबंधित माहिती.
•मार्गदर्शन : कायदेविषयक (वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी इ.), आर्थिक, पेन्शन संबंधित सल्ला, आणि सरकारी योजनांची माहिती•भावनिक समर्थन: चिंता निराकरण, नातेसंबंध व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित भीती निवारण, जीवन व्यवस्थापन, (वेळ, ताण, राग व्यवस्थापन) मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण (मृत्युपत्र बनवण्याचे महत्व इ.)•क्षेत्रीय पातळीवर मदत: विविध सरकारी यंत्रणा, भागधारक, स्वयंसेवक, सामाजिक संस्था यांचे मदतीने बेघर वृद्ध, अत्याचारग्रस्त ज्येष्ठ नागरिक, किंवा हरवलेल्या व्यक्तींना मदत करण्याचा प्रयत्न व त्यांना परिवाराशी पुनर्मिलन करणे साठी कार्य करणे.
एल्डर लाईन टीम विषयी : एल्डर लाईन 14567 ची टीम कनेक्ट सेंटर च्या माध्यमातून व जनसेवा फौन्डेशन च्या माध्यमातून संस्थापक चेअरमन डॉ. विनोद शहा, सौ.मीना शहा , श्री जयदेव नाईक व अन्य विश्वस्त तसेच महाराष्ट्र राज्य एल्डर लाईन 14567 चे प्रकल्प व्यवस्थापक: श्री. स्मितेश शहा, टीम लीडर : प्रियांका कांबळे, गजानन इंगळे. स्टेला काकडे, राजेंद्र आहेर यांचे सह सर्व कनेक्ट सेंटर ऑफिसर सातत्याने कार्यरत आहेत.अधिक माहिती : एल्डर लाईन 14567 या हेल्पलाईन आणि तिच्या संपूर्ण भारतातील सेवांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वेबसाईट www.elderline.dosje.gov.in
एल्डर लाईन 14567 महाराष्ट्र ने प्रत्यक्ष केलेले मदत कार्याची उदाहारणे -•मुंबई मध्ये सापडलेले एक ज्येष्ठ नागरिक स्मृतीभ्रंश असलेमुळे आपला घरचा पत्ता नीट सांगू शकत नव्हते, दोन महिन्यांचे पाठपुराव्यातून सदर व्यक्तीचे गुजरात मधील घर व नातेवाईक शोधले सदर व्यक्ती ३० वर्षापूर्वी घर सोडून गेल्याचे कळले आशा वृद्धास तीस वर्षानंतर परिवाराशी पुनर्मिलन करून संपूर्ण भारतात एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचे कार्य एल्डर लाईन महाराष्ट्र ने केले आहे.
•हैद्राबाद येथील एका मुलाने 70 वर्षीय मावशीला शिर्डी येथे देवदर्शनाला जायच्या नावाखाली मुंबई येथे सायन भागात सोडून निघून गेला. रात्र झाल्यानंतर सायन पोलिसांनी सदर आजींचा व्हिडीओ सर्वत्र पाठवल्यानंतर महाराष्ट्र टीम, सायन पोलीस, हैद्राबाद टीम ने 36 तासाचे आत सदर आजींच्या नातेवाइकाना शोध घेतला व त्यांचे समुपदेशन करून वृद्ध महिलेच्या परिवाराशी पुनर्मिलन यशस्वीरीत्या पूर्ण केले.
•अमरावती जिल्यातील एका ज्येष्ठ नागरिक व्यक्तीला त्याची मुल त्यांना सांभाळत नाही व केस करून सुद्धा काहीच कार्यवाही झाली नाही. त्यानंतर हेल्पलाईन प्रतिनिधी यांनी पाठपुरावा करून जिल्हा प्रसासना मार्फत कार्यवाही केली व केस साठी तारीख दिली व केस सुरू झाली. यामध्ये मुलांना बोलावण्यात आहे व त्यांनी केस सुरू होण्या आधीच मुलाने मान्य केले की ते महिन्याचा आई वडिलांचा खर्च देण्यास तयार आहे. हेल्प लाईन नी त्यांची मदत केल्या मुळे हे सर्व लवकर होऊ शकले असे समस्या ग्रस्त व्यक्ती नी म्हटले व हेल्प लाईन चे आभार मानले
“एल्डर लाइन 14567 चे कार्य सुरू झाल्यापासून त्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला मोठा आधार झाला आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी एक जागरूक नागरिक या नात्याने समाजाने याचा योग्य फायदा घेणे महत्त्वाचे आहे. देशात ज्येष्ठांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुले परदेशी वास्तव्यास असल्याने आणि मुलीचे लग्न झाल्याने घरात जेष्ठ व्यक्तींना एकटेच राहण्याची वेळ आली आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाइन सक्रीय आहे व कार्यरत आहे. तरी, ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी जागरूकता निर्माण करावी” – स्मितेश शहा, प्रकल्प व्यवस्थापक , एल्डर लाईन 14567 महाराष्ट्र राज्य.